पुणे :
‘नोटाबंदी निषेध, पुणे’ आयोजित नागरी सभेला मंगळवारी सायंकाळी मोठा प्रतिसाद मिळाला.नोटा बंदीतून अर्थव्यवस्थेत मंदी आली आणि स्वायत्त संस्थांचा ऱ्हास पर्वास प्रारंभ झाला असा आरोप या नागरी सभेत केला गेला.
अर्थतज्ज्ञ अभय टिळक, अॅड. अजित अभ्यंकर, रत्नाकर महाजन, डॉ.विश्वंभर चौधरी या नागरी सभेत सहभागी झाले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.एस एम फाऊंडेशन येथे ही नागरी सभा झाली.
अॅड. असीम सरोदे म्हणाले, १९७८ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा तो प्रक्रिया पार पाडून रिझर्व बँकेने जाहीर केला होता. मोदींनी ही प्रक्रिया पाळली नाही. खोटे दावे करणे ही या सरकारची सवय झाली आहे. नोटा बंदीच्या अर्थ नीतीच्या मागे अनर्थ नीती आहे.
अभय टिळक म्हणाले, ‘काळा पैसा रोखीच्या स्वरूपात ठेवला जात नाही, हे मोदी सरकारला कळले नाही. सुगीच्या वेळेस नोटा बंदी झाल्याने शेतीचे कंबरडे मोडले गेले. नोटा बंदी, जीएसटीने विकासदरावर परिणाम झाला. क्रोनी कॅपिटालायजेशनचा नवा चेहरा दिसू लागला. रिझर्व बँकेच्या स्वायतत्तेचा संकोच झाला, ही ऱ्हास पर्वाची चुणूक आहे.
रत्नाकर महाजन म्हणाले, कोणत्याही आर्थिक निकषावर नोटा बंदीचा निर्णयाचे समर्थन करता येत नाही. उलट दोन हजाराच्या नोटांनी भ्रष्टाचार सोपा झाला. नोटा बंदी हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय आहे. तरी प्रधान प्रचारक आणि प्रचारकांची टोळी अहंगंड सोडायला तयार नाहीत.
अॅड. अजित अभ्यंकर म्हणाले, ‘ नोटा बंदी निर्णय फसला यात शंका नाही. मात्र,काळ्या पैशाची समस्या फक्त पंतप्रधानांच्या हाती देण्याइतकी किरकोळ नाही.जनतेने या बेकायदेशीर उत्पन्नाविरूध्द क्रांतीकारक लढाई केली पाहिजे. बँकांमध्ये आलेला पैसा काळा नाही, हे सरकारलाच सिद्ध करावे लागणार आहे. सोन्याची आयात या वर्षात दुप्पट झाली. सोने कोणी घेतले, बेनामी प्रॉपर्टी कोणी घेतल्या याची श्वेतपत्रिका आणा.म्हणून नोटा बंदी हा कावा होता असे म्हणावे लागते. नोटा मोजायला वेळ का लागला ? खोट्या नोटांची समस्या संपली नाही.बेहिशेबी पैशाच्या समस्येविरुद्ध लढण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘ नोटा बंदीच्या विरोधात सिव्हील सोसायटीच्या माध्यमातून देशभर कार्यक्रम होत आहेत. राजकीय पक्ष एकत्र आले, पुरोगामी संस्था एकत्र आले, हेही महत्वाचे झाले. नोटा बंदीच्या निर्णयानंतर किती ज्वेलर्स वर कारवाई झाली ? काळा पैसा पांढरा होताना कमिशन कोणाकडे गेले ? कोणत्या पक्षाने जमिनी खरेदी केल्या? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. रिझव्र्ह, बँकेने ज्या नोटा वाटल्या त्याची नोंद का ठेवली नाही. नोटा बंदीने ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघाली. १२० माणसे जाऊनही उर्मटपणाने नोटा बंदीचा वर्धापनदिनाचा उत्सव केला जात आहे. हे सरकार असंवेदनशील आहे. लोकशाही कशी चालणार हा प्रश्न आहे.
तुघलक शहाणा वाटावा अशी परिस्थिती आहे. लोकांची नजर आहे, असा जाब विचारला पाहिजे. पंतप्रधानपद हे हिरो गिरीचे पद नाही.जादूगाराचे पद नाही, हे जनतेने सांगीतले पाहिजे.
कार्यक्रमानंतर सेनापती बापट यांच्या पुतळ्यासमोर १२० मेणबत्त्या लावून नोटबंदी रांगांमध्ये मृत पावलेल्या भारतीय नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
नरेश बोडके यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मी ला सप्तर्षी, अभय छाजेड, ९१ वर्षीय कम्युनिस्ट कार्यकर्त्य शांता रानडे, अन्वर राजन, आनंद करंदीकर, अशोक धिवरे, अप्पा अनारसे उपस्थित होते