मंत्री प्रकाश जावडेकर यांची ज्ञानप्रबोधिनी प्रशालेस भेट
पुणे :’शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाची, समाज आणि देशाची प्रगती शक्य असल्याने आगामी दोन वर्षात विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे आणि पोर्शन पन्नास टक्क्यांनी कमी करून विद्यार्थांना जीवन शिक्षणाच्या विद्येकडे नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दुपारी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेस भेट दिली.
ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोग प्रदर्शनाला, धडपड प्रयोगशाळेला त्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधला आणि वाटचालीची माहिती घेतली.यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘रुप पालटू देशाचे’ हीच ज्ञानप्रबोधिनीची खरी ओळख आहे, शिक्षण अधिक चांगले करण्यासाठी, राष्ट्रीय धोरण करताना ज्ञान प्रबोधिनीच्या अनुभवाचा उपयोग करु .
विशेष बुध्दीमान विद्यार्थ्याना देशासाठी घडविण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी ५५ वर्ष प्रयत्नशील आहे. प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी समाजाच्या विकासात योगदान दिल्याने हा देशात वेगळा प्रयोग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शिक्षण क्षेत्र उत्तरदायी, करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ‘लर्निंग आऊट कम’ वर भर दिला जात आहे. नॅशनल असेसमेंट सर्वे हेही महत्वपूर्ण पाऊल आहे. चांगले शिक्षक, अद्यापक घडविण्यासाठी इंटीग्रेटेड बी.ए. अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ.गिरीश बापट, कार्यवाह सुभाष देशपांडे, यशवंतराव लेले, डॉ. वा.ना. अभ्यंकर, डॉ. विवेक कुलकर्णी, प्राचार्य मिलिंद नाईक, प्रा. राम डिंबळे, प्रा. विवेक पोंक्षे, मोहन गुजराथी उपस्थित होते.
विक्रम जिगराळे चिन्मयी खरे व विद्यार्थी चमूने प्रकल्पांचे सादरीकरण केले.संस्कृती बापट यांनी सूत्रसंचालन केले.
‘विकसित कौशल्ये देश विकासासाठी उपयोगात आणणाऱ्या विदार्थांनी घडविण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी प्रयत्नशील आहे ‘ असे ज्ञान प्रबोधिनी चे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी सांगितले