पुणे :विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या उद्बोधनपर भाषणांचे संकलन असलेल्या ‘सेवा समर्पण’ (अध्यात्मिक जीवनाची साधना) ग्रंथाचे प्रकाशन शनिवार २५ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘चाणक्य मंडल’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी आणि ‘लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या हस्ते हे प्रकाशन सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांचे ‘प्रशासनातील सेवाभाव’ विषयावर व्याख्यान होणार आहे.
एकनाथजी रानडे यांनी जीवनव्रती प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी केलेल्या उद्बोधनपर व्याख्यानांचे संकलन ‘सेवा समर्पण’ या ग्रंथात आहे. सुधीर जोगळेकर (मराठी प्रकाशन विभागाचे सचिव), जयंत कुलकर्णी (विवेकानंद केंद्र संचालक, पुणे शाखा) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या पुस्तकाचे लेखन सुनिता करकरे यांनी तर पुस्तकाचे संपादन निवेदिता भिडे यांनी केले आहे .
कन्याकुमारीतील शिलाखंडावरील विवेकानंद स्मारकाला २०२० साली ५० वर्षे होत आहेत तर विवेकानंद केंद्राच्या स्थापनेला २०२२ साली ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने अनेक महत्वाकांक्षी प्रकाशनांची आखणी केली आहे.
केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांनी विवेकानंदांचा विचार देशभर घेऊन जाणाऱ्या जीवनव्रती कार्यकर्त्यांची कल्पना मांडली आणि तिला देशभरातून युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्यातून निवडलेल्या कार्यकर्त्यांपुढे एकनाथजी ४० व्याख्याने गुंफत असत. ती सर्वच व्याख्याने ध्वनिमुद्रित झाली नव्हती, परंतु त्यातल्या अनेकांची टिपणे कालांतराने उपलब्ध होत गेली. त्या व्याख्यानांचे शब्दांकन म्हणजे पूर्वीचे ‘सेवा साधना ‘आणि आत्ताचे विस्तारित रूपातील ‘सेवा समर्पण’ हा ग्रंथ आहे