रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. १९ मे) दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांची नोट बाजारात आली होती. आरबीआयने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही या निर्णयाची खिल्ली उडवली. “आधी ते म्हणाले, दोन हजारांच्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. आता म्हणत आहेत, दोन हजारांची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येईल. यासाठी आम्ही म्हणतो की, पंतप्रधान शिकला-सवरलेला असावा. एक अडाणी पंतप्रधानाला कुणीही काहीही सांगते. त्याला काहीही सजमत नाही. मात्र त्रास तर जनतेला सहन करावा लागतो.”, अशा शेलक्या शब्दात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.