पुणे- केवळ बंद झालेली दारूची दुकाने आणि हॉटेल्स चालू व्हावीत यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा शहरात समावेश करण्याचा पालकमंत्री गिरीश बापट यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
सर्वोच्च न्यायालायने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या परिसरात दारू विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. या घडामोडीच्या मागे पालकमंत्री गिरीश बापट हे असून कोणत्याही परिस्थितीमध्ये हे रस्ते दारूची दुकाने उघडण्यासाठी शहरात आणू नये. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पुणे महापालिकेत भजन करीत आणि पालकमंत्र्याच्या फोटोला दारुच्या बाटल्यांची माळ घालून आंदोलन करण्यात आले.
या वेळी शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, पुणे शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग महापालिकेत समावेश करण्याच्या घडामोडी घडताना दिसत आहे. हे रस्ते महापालिकेत घेण्याबाबत कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसत आहे. या सर्वांमागे पालकमंत्री असून हे रस्ते महापालिकेत आल्यास त्यांच्या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.