पुणे- कोणी गमतीने अलीबाबाबाची गुहा म्हणेल.कोणी महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणेल ..अशा स्थायी समिती च्या सदस्यांमधून ८ सदस्य निवृत्त होत आहेत .यात भाजपचे सहा तर राष्ट्रवादीचे २ सदस्यांचा समावेश आहे .यांच्या जागेवर वर्णी लावून घेण्यासाठी भाजपमधील २६ तर राष्ट्रवादी मधून २१ नगरसेवक रेस मध्ये उतरले आहेत .यातून आता कोणाला आपापल्या नेत्याकडून स्थायी ची लॉटरी लाऊन घेण्यात यश येईल ते उद्याच स्पष्ट होणार आहे .
राष्ट्रवादीचे दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे तसेच भाजपचे राजाभाऊ बराटे ,सुनील कांबळे,मंजुश्री नागपुरे ,माऊली तुपे,कविता वैरागे,नीलिमा खाडे हे स्थायी समितीचे सदस्य २ वर्षाचा आपला कालावधी पूर्ण करून निवृत्त होत आहेत .आज पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मुख्य सभा तहकूब होईल ,त्यानंतर स्थायी च्या नव्या सदस्यांची हि निवड घोषित होईल . अर्थात भाजपच्या नवसद्स्यांची नावे मुख्यमंत्रीच पुण्याचे नेते असल्याने त्यांच्याकडून च येतील आणि राष्ट्रवादीची नावे अजित पवार यांच्याकडून येतील .
भाजपमधून महेश लडकत, राजेश येनपुरे, हेमंत रासने, प्रसन्न जगताप, अर्चना पाटील, धनराज घोगरे, मंजुश्री खर्डेकर, सुनील कांबळे, मानसी देशपांडे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, आरती कोंढरे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, किरण दगडे, ज्योती कळमकर, जयंत भावे, मानसी देशपांडे आदी नगरसेवकांनी स्थायी समितीसाठी इच्छा व्यक्त केली.तर राष्ट्रवादी मधून प्रकाश कदम ,विशाल तांबे, सुनील टिंगरे,भैय्या साहेब जाधव ,योगेश ससाणे, माजी महापौर असलेल्या वैशाली बनकर असे २१ ते २२ जन इच्छुक आहेत .
या आठ सदस्यांच्या निवडीनंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. यासाठी भाजपमधील मूळ सदस्य, तसेच महापालिका निवडणुकीत इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये चुरस रंगते आहे. विशेष म्हणजे तीन आमदारांचे नातेवाईक असलेले अनुक्रमे रंजना टिळेकर ,वर्षा तापकीर ,आणि सुनील कांबळे हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत तर मराठा समाजाला अध्यक्षपद दिले पाहिजे हि मागणी लक्षात घेवून उमेश गायकवाड यांनी अध्यक्षपदाच्या रेस मध्ये उडी घेतली आहे. मात्र या रेस मध्ये सुनील कांबळे यांचेच नाव आघाडीवर असल्याचे दिसते आहे.
स्थायी समितीत सध्या असलेल्या भाजपच्या सदस्यांकडून अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. तर, स्थायी समितीचे सदस्यत्व मिळवून नंतर अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठीही जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या सहा जागांसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या सर्व आमदारांच्या बैठकीत सदस्य निवडीबाबत चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी सर्व आमदारांना आपआपल्या इच्छुक नगरसेवकांची नावे सूचविण्यास सांगितले आहे. शहरात भाजपचे आठ आमदार असले, तरी स्थायी समितीत सहा सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या सहा जणांमध्ये नंबर लावण्यासाठी २६ नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
काही नगरसेवकांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही गळ घातली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पालकमंत्र्यांना एका नावाची शिफारस केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी झालेल्या पुणे दौऱ्यातही प्रमुख इच्छुकांची त्यांच्याभोवती असलेली लगबग लक्ष वेधून घेणारी होती.
दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे स्थायी समिती सदस्यत्वासाठी इच्छूक नगरसेवकांच्या नावांची यादी मंगळवारी दिली. या यादीमध्ये आमदारांनी सूचविलेल्या नावासह मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या यादीतील नावांमधून सहा नावे स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी येणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते आहे.