पुणे: उन्हाळयात पाण्याची मागणी वाढलेली असतानाच; नगर रस्ता परिसरात सातत्याने कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाहीत. याबाबत प्रशासनाला वारंवार पत्र देऊन तसेच तातडीनं इतर पर्यायाद्वारे नागरिकांना पाणी देण्याची विनंती करूनही काहीच फरक पडत नाही. त्यामुळे नगर रस्ता परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी येत्या 28 मे पासून महापालिके समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांना दिला आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येणार असल्याने नगरसेवक महेंद्र पठारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पठारे म्हणाले की, गेल्या काही वर्षात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. चंदननगर, खराडी, साईनाथनगर, वडगावशेरी, विमाननगर, लोहगाव परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अचानक दोन दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तर येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी असतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी तासंतास घालवावे लागतात. याबाबत अनेकदा मोर्चा, आंदोलनही केली असून मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठविला आहे. या नंतर काही दिवस पाणी पुरवठा सुरळीत होतो.
मात्र, त्यानंतर पुन्हा पाण्यासाठी टॅंकरचा नागरिकांना पाण्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे एका बाजूला मिळकतकरात पाणीपट्टी भरूनही दुसऱ्या बाजूला टॅंकरसाठीही पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पाण्यासाठी नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी आता आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महापालिका आयुक्तांना माहीती देण्यात आल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले.