पुणे : एस आर ए आणि पंतप्रधान आवास योजनेचे काम पुण्यात अजूनही समाधान कारक नसल्याचे स्पष्ट करीत, पुण्यातील झोपडपट्ट्यांसाठी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी एसआरए योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या कोथरुड नागरी सत्कार सोहळ्यात श्री. पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,खासदार गिरीष बापट, , माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेना नेते आणि माजी मंत्री शशिकांत सुतार, सिनेनाट्य अभिनेते विक्रम गोखले यांसह इतर अनेक पक्षांचे, विविध संस्थांचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले की, पुण्याचे शहरीकरण जसे वाढत आहे, तसे झोपडपट्ट्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघात जवळपास ८० हजार मतदार झोपडपट्टीत राहत आहेत. त्यामुळे यांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन पुण्याला झोपडपट्टी मुक्त शहर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपला मतदारसंघ समस्या मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना करतात. त्यानुसार गेल्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही कोल्हापूरमध्ये अनेक उपक्रम राबविले. यामुळे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले. असेच काम आता पुण्यात देखील उभारले पाहिजे. त्यासाठी मुरलीधर अण्णांना खूप मोठी राजकीय संधी आहे, त्यांचे राजकीय आयुष्य मोठे आहे, आमचे त्यामानाने 5/10 वर्षे आहेत पण अजुन त्यांना आमदार, खासदार, राज्यात , केंद्रात मंत्री होण्याची संधी आहे त्यामुळे सर्वांना बरोबर घेवून जनहिताची काम करावीत. इव्हेन्ट मैनेजमेंट वर या पुढे निवडणुका जिंकता येणार नाहीतच असे ही ते म्हणाले.
दरम्यान, कोथरूडमध्ये सांस्कृतिक कला केंद्र उभारण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत असल्याबद्दल श्री. पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या कला केंद्रात प्रशिक्षण केंद्र देखील कार्यन्वित केले जाणार आहे.