काबुल -तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानीवरच नव्हे, तर राष्ट्रपती भवनावर सुद्धा ताबा मिळवला आहे. आता हेच तालिबानी सरकार स्थापनेच्या हालचाली करत आहेत. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह देश देश सोडून पसार झाले. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने लोक लाखोंच्या संख्येने पलायन करत आहेत. तर विमानतळावर अशी हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे.
अफगाणिस्तानच्या विमानतळावर सध्या इतकी गर्दी पाहायला मिळते जणू ते विमानतळ नसून बस स्टँड आहे. आपल्या जीवासमोर सामानाची काय चिंता. आपले सर्वस्व सोडून हजारोंच्या संख्येने लोक विमानतळ गाठत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसावे असे चित्र आहे. राजधानीत लोकांना आपले मोबाईल रिचार्ज सुद्धा करता येत नाही. तर काही लोक आपले कॉल बॅलेन्स आणि इंटरनेट जीवन मरणाच्या परिस्थितीसाठी राखून ठेवत आहेत.
काबुलमध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. देशातून पलयान करणे हेच त्यांचे लक्ष्य आहे. अशात सर्वात महत्वाचे साधन पैसा काढण्यासाठी लोकांनी बँकात गर्दी केली. काबुलच्या सर्वच बँकांमधून पैसे काढण्यासाठी लोक रांगा लावून उभे आहेत. कित्येक परदेशी नागरिक आप-आपल्या दूतावासातून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ बँकाच नव्हे, तर राजधानीतील विविध देशांच्या दूतावास कार्यालयांजवळ लोकांची गर्दी दिसून येत आहे.
तालिबान म्हणते- इतके सहज देश ताब्यात घेता येईल विचारही केला नव्हता
तालिबानने रविवारी प्रेसिडेन्शिअल बिल्डिंग ताब्यात घेतली. यावेळी बोलताना तालिबानी म्हणाले, की “सर्वांनाच सुरक्षा दिली जाईल. येत्या काही दिवसांत आम्ही देशात सत्ता स्थापित करणार आहोत. सर्वच गोष्टी नियंत्रणात येतील. आम्ही विचारही केला नव्हता की इतक्या सहज आणि लवकर देशावर ताबा मिळवता येईल. येत्या काही दिवसांमध्ये परिस्थिती सामान्य होईल.”याच दरम्यान, देशात शांतता बहाल करण्यासाठी समन्वय परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझई त्याचे नेतृत्व करत आहेत. यामध्ये अफगाणिस्तानचे विद्यमान सीईओ अब्दुल्ला अब्दुल्ला आणि बंडखोर नेता गुलबुद्दीन हिकमतयारचा देखील समावेश आहे. अफगाणिस्तानचे नाव बदलून तालिबान लवकरच ‘इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ची घोषणा करणार अशी शक्यता आहे.