पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी एक समतोल अशी घटना लिहिलेली आहे. आपण सर्वानी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण केल्यामुळेच आपला देश प्रगत होईल असे प्रतीपादन, केंद्रींय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, श्री. नारायण राणे यांनी आज पुण्यात केले.
सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आज दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. नारायण राणे, तसेच सन्माननीय अतिथी म्हणून विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना श्री. नारायण राणे म्हणाले कि, आजचा दिवस हा अत्यंत प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचे विचार संग्रहालय आणि स्मारकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य सिंबायोसिस करीत आहे.
श्री. देवेंद्र फडणवीस, अभिवादन सभेत आपल्या भाषणात म्हणाले की, आपण सर्वानी संकुचित वृत्ती सोडून व्यापक विचार करायला शिकले पाहिजे. बाबासाहेबानी सांगितलेल्या मार्गावर आपण सर्वजण एकदिशेने गेल्यास आपला देश हा नक्कीच विकसित देश बनू शकेल.आपल्या देशासमोर असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही संविधानात सापडतात. समाजातील कोणताही घटक कोणत्याही प्रकारे मागे राहणार नाही याचा विचार बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानात केलेला आहे. देशातील सांस्कृतिक एकात्मता जपण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानातून केले आहे.
डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक व अध्यक्ष सिंबायोसिस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली.
या अभिवादन सभेसाठी पुण्याचे महापौर, श्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते. सौ. संजीवनी मुजुमदार, मानद संचालिका, सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक,यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस यांनी आभार प्रदर्शन केले.