संपूर्ण क्रांती रथ यात्रेद्वारा देशभरातील रिटेल व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती
पुणे, दि. 10 : अमेझॉन, वॉलमार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या एफडीआयच्या माध्यमातून रिटेल व्यवसायात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे देशातील रिटेल व्यापारी उध्वस्त होणार आहे. याचा विरोध म्हणून काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट)च्या वतीने देशभर संपूर्ण क्रांती रथ यात्रा काढण्यात आली. हा यात्रा रथ पुण्यात दाखल झाला असून त्याचे स्वागत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले.
सिंहगड रस्त्यावरील परिणय मंगल कार्यालयात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि कैट यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांना रिटेल व्यवसायातील अडचणी व परकीय गुंतवणुकीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य संकटांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कैटचे प्रभारी वीरेंद्र सिंह वालीया, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, पश्चिम विभागीय प्रभारी अजित सेटिया, दिलीप कुंभोजकर, अमरसी कारीया, सुनिल गेहलोत, नवनाथ सोमसे, अजित चंगेडीया, सारंग राडकर, रामभाऊ दोडके, नितीन पंडित, उमेश यादव, भोनाराम चौधरी, कमलेश शहा, विनोद चौधरी, मिश्रीलाल चौधरी, ढगलाराम चौधरी, सोनुसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
वॉलमार्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या किरकोळ क्षेत्रात आल्यास भारतीय रिटेल व्यापारी धोक्यात येऊ शकतो. याविषयी किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी संपूर्ण क्रांती रथ यात्रा चे आयोजन केले आहे. ही यात्रा देशभरात २२ हजार किमी चा प्रवास करत २८ राज्ये १५० ते २०० शहरातून प्रवास करणार आहे. 15 डिसेंबर रोजी ही रथ यात्रा दिल्लीत दाखल होईल. 16 डिसेंबरला देशभरातील रिटेल व्यापारी दिल्लीत येणार असून परकीय गुंतवणुकीच्या विरोधात मोठा मोर्चा निघणार आहे, असे वीरेंद्रसिंह वालिया म्हणाले.
अमेझॉन, वॉलमार्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या रिटेल व्यापाऱ्यासमोर बलाढ्य शत्रू म्हणून उभ्या आहेत. या कंपन्या परदेशातून कमी टक्के व्याजाने भांडवल उभे करून भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. आम्हला शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. हे आमच्यावरील मोठे संकट आहे. या संकटाविरोधात आम्ही एकत्र येऊन समर्थपणे लढा उभारणार आहोत. येणाऱ्या दिवाळी सणाला ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आम्हाला योग्य दरात माल देणार नाहीत त्या कंपन्यांवर आम्ही बहिष्कार टाकण्यात येईल. स्वदेशी कंपन्यांना माल खरेदीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे सचिन निवंगुणे यांनी सांगितले.