मुंबई – संकटाच्या काळात आम्ही सुख ,समाधान, शांती परमेश्वराच्या पायी शोधात असतो. आज मंदिरावर अवलंबून छोटे- मोठे व्यवसायही बंद आहेत त्यामुळे त्यांची उपासमार होत होती.त्यासाठी मंदिर उघडणं आवश्यक असल्याची सांप्रदायिक मंडळीची मागणी होती, त्या मागणीला भाजपाने पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा दबाव व जनतेचा रेटा यामुळेच सरकारला मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
बोरीवली अशोकवन हनुमान मंदीरासमोर भाजप कार्यकर्त्यांसोबत मंदिर उघडल्याबद्द्ल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राज्यातील सरकार पाडून दाखवा..पाडून दाखवा… असे कोणीही बोलले नसताना त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे, म्हणूनच त्यांनाच स्वत: सरकार पडणार असल्य़ाची सारखी भीती वाटत असावी, असा टोला दरेकर यांनी मारला.
यावेळी भाजप मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, नगरसेविका प्रितम पंडागळे, ॲड. शिवाजी चोगुले, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी भोसले, महामंत्री ललित शुक्ला आदि उपस्थित होते.
मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्रातून उठाव झाला. सांप्रदायिक मंडळी मंदिर उघडण्यासाठी पुढे आली. मंदिरावर ज्यांच्या उपजिविका अंवलंबून आहेत त्यांनीही मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाने मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच भाजप यामध्ये सहभागी झाली होती, त्यामुळे या आंदोलनामध्ये कोणता पक्ष प्रामाणिकपणे उतरला होता, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.