पुणे : जगातील दहशतावादाचा वाढता धोका कमी करण्यासाठी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा धोका कमी करायचा असेल तर दहशतवाद्यांचे केंद्र असणार्या पाकिस्तानला सामरिक हद्दीपासून तोडणे यावर पाश्चिमात्य देशांतही चर्चा आणि काम सुरू आहे. पाकिस्तानचे सिंध आणि बलुचिस्तान यांच्या अंतर्गत संघर्षामुळेच हे भाग वेगळे होतील. त्यामुळे येत्या काही वर्षांत पाकिस्तानचे पुन्हा विभाजन होणे अटळ आहे, असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांनी आज येथे व्यक्त केले. पुणे मनपा कॉँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन येथे ते बोलत होते.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून 3 ते 16 डिसेंबर 2021 अशा ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुभारंभाचा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या सहभागातून संपन्न झाला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस जॉइंट कमिशनर डॉ. रवींद्र शिसवे, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, नरेंद्रपालसिंग बक्षी, नगरसेवक दत्ता बहिरट, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, माजी महापौर रजनी त्रिभुवन, शहर काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड,सौ. जयश्री बागुल, अमित बागुल यांसह अनेक मान्यवर व नागरिक या वेळी उपस्थित होते.
1965 आणि 1971 च्या युद्धात सहभागी टी-55 या प्रदर्शनीय रणगाड्याचे लोकार्पण लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या हस्ते आज सकाळी वसंतराव बागुल उद्यान येथे झाले. यावेळी उपस्थितांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या उत्स्फूर्त घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला. सैन्यदलाने पुणे महानगरपालिकेस भेट म्हणून दिलेला हा रणगाडा नागरिकांना बघण्यासाठी खुला असणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन येथे नव्याने बसविण्यात आलेल्या 27 एलईडी स्क्रीनच्या डिजिटल लायब्ररीचे आणि 1971 च्या युद्धातील एकशे एक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लेफ्ट. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त), मनपा आयुक्त विक्रमकुमार आणि पोलिस जॉइंट कमिशनर डॉ. शिसवे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रदर्शनातील छायाचित्रे बघताना लेफ्ट. जन. शेकटकर (निवृत्त) यांनी 1971 च्या युद्धातील अनेक प्रसंगांचे रोमहर्षक वर्णन उपस्थितांना केले.
1971 चा पाकिस्तानवरील विजय हा अभूतपूर्व असून, दुसर्या महायुद्धानंतर एकाच देशातील 93 हजार सैनिकांनी त्यांच्याच भूमीवर शरणागती पत्करणे ही जगातील एकमेव घटना आहे असे सांगून लेफ्ट. जन. शेकटकर (निवृत्त) म्हणाले की, 3 डिसेंबर 1971 या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी कोलकात्यामध्ये एका समारंभात होत्या. तिथे त्यांना सायंकाळी पाच वाजता पाकिस्तानने काही भारतीय हवाईतळांवर हल्ले केल्याची माहिती देण्यात आली. तेथून त्या ताबडतोब दिल्लीला परतल्या आणि लगेच युद्धाची घोषणा केली. 13 डिसेंबर या दिवशी युद्ध आपण जिंकणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यावेळी मेजर निर्भय शर्मा हे पत्र घेऊन पूर्व पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल नियाझींना भेटायला गेले. त्या पत्रात ‘देशवासीयांना वाचविण्यासाठी शरणागती पत्करण्यास सांगण्यात आले होते. यावेळी जनरल नियाझींनी ‘रावळपिंडी और लाहोर में बैठनेवाले अधिकारियों ने हमें मरवा दिया’ अशा शब्दांत त्यांना शिव्या घातल्याची आठवण त्यांनी सांगितली.
जगातल्या 58 देशांना आजही भारताची प्रगती बघवत नाही असे सांगून ते म्हणाले की, यूएई, दुबईसारख्या ठिकाणी मंदिरे बनली, जगात ‘योग डे’ म्हणून योगा सुरू झाला. अशा अशक्य वाटणार्या घटना घडत आहेत. भारता हा राष्ट्रशक्ती म्हणून उभा राहात आहे. त्यामुळे नव्या पिढीने ‘अगर है हमें प्यार तो हरदम कहना चाहिए । मैं रहूँ या ना रहूँ भारत देश रहना चाहिए । शत्रू सीमा में रहना सीख ले । भारत अमर है यह सत्य भी सीख ले।’ अशा शब्दांत त्यांनी युवाशक्तीने देशाप्रती व लष्कराप्रती सदैव आदरभाव ठेवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम सदैव प्रेरणादायी ठरेल असे गौरवद्गार आबा बागुल यांच्याबद्दल शेकटकर यांनी काढले.
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार म्हणाले, ‘त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी युद्ध एक महिना उशिरा सुरू करण्याचा सल्ला पंतप्रधान इंदिराजींना दिला. त्यांनी तो सल्ला मानला आणि योग्य व्यक्तीचा सल्ला आपण मानत असल्याचे दाखवले.’ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे प्रमुख जनरल जगन्नाथराव भोसले या सैन्यातील शहानवाझ खान, हबीबुल्ला यांचा नंतर पं. नेहरू यांनी सन्मान केला आहे. जनरल भोसले यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे देशाचे प्रमुख करून केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा दिला. इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाने अवघ्या तेरा दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे केले व जगाचा इतिहास, भूगोल बदलला. अशी भारताची ही एकमेव कणखर महिला पंतप्रधान होती, असे गौरवद्गार उल्हास पवार यांनी काढले. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नेतृत्व आणि भारतीय लष्कराचे कर्तृत्व याबद्दल सारा देश सदैव ऋणी आहे’ असे सांगितले. तसेच असा स्तुत्य द्विसप्ताह आयोजित केल्याबद्दल आबा बागुल व पुणे महानगरपालिका यांचे अभिनंदन केले.
प्रारंभी या द्विसप्ताह संकल्पनेचे जनक आबा बागुल म्हणाले की, ‘भारत जगातल्या कोणत्याही मोठ्या शक्तीपुढे झुकत नाही हे 1971 च्या युद्धाच्या वेळी पंतप्रधान इंदिराजींनी जगाला दाखवले’. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणारे सैनिक यांची चिरंतन स्मृती नव्या पिढीसमोर राहावी म्हणून या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून आबा बागुल पुढे म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. मात्र, त्याच्यावर कुणी हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत समर्थ आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. आता पुढील पिढीने दहशतवादाचे केंद्र बनलेल्या उरल्यासुरल्या पाकिस्तानचे चार तुकडे करावेत असे आबा बागुल म्हणाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. या संपूर्ण द्विसप्ताहासाठी लष्करासोबत समन्वय साधणारे नरेंद्रपालसिंग बक्षी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी 100 फूट बाय 20 फूट पाण्याच्या पडद्यावर दाखवल्या जाणार्या व 16 डिसेंबर रोजी समारोप प्रसंगी उद्घाटन होणार्या 20 मिनिटांच्या थ्रीडी लेझर चित्रफितीचा तीन मिनिटांचा टीझर दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाार्या व ऑर्डनन्स ऑफिसर म्हणून नुकतेच निवृत्त झालेल्या घनश्याम सावंत यांचा विशेष सत्कार यावेळी लेफ्ट. जन. शेकटकर (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन वीरेंद्र किराड यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपला. प्रदर्शनीय रणगाडा व फोटो प्रदर्शन बघण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.