मुंबई, दि.२४ मार्च – हत्या, खंडणी, बदली रॅकेट, करोनातील अपयश, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, अशा महाविकास आघाडीच्या विविध 100 अपयशांची प्रकरण आणि त्यावरील मुख्यमंत्र्यांचे मौन याबाबत भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेतली असून महाविकास आघाडी सरकारच्या सर्व गैरकारभाराबाबत प्रशासनाकडून अहवाल मागवावा, जनतेला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, भीतीमुक्त वातावरण मिळावं, अशी मागणीही आम्ही केली असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी माध्यमांना दिली.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, राज्य अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे, सत्तेकरिता आघाडी सरकारने नैतिकता पायदळी तुडवली असून सरकार टिकविण्यासाठी मुख्यमंत्री डोळेझाक करून ‘नरो वा कुंजरो’ अशी भूमिका घेत आहेत, ज्याची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे. हे महाविकास आघाडी सरकार नसुन महावसूली सरकार आहे,अशी टीकाही दरेकर यांनी केली.
राज्यात काँग्रेसचं अस्तित्व हरपलेलं दिसून येत असून काँग्रेसला भ्रष्टाचारातील किती हिस्सा किंवा वाटा मिळतो, अशी शंका निर्माण होत आहे. कारण, या सर्व प्रकारणांबाबत स्पष्ट भूमिका घेऊन कॉँग्रेसने समोर यायला हवे, पण काँग्रेस सुद्धा “हम भी तुम्हारे साथ है” अशा प्रकारची चुप्पी साधून आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.