मुंबई- जर मंदिरे उघडली नाही तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिरांसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी मनसेने हि आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. याच संदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी केली साजरी
मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करु द्यावा अशी मागणी केली होती. मनसे अध्यक्षकांनी मनसैनिकांना दहीहंडी साजरी करण्याचे आदेश दिले. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारकडून मनाई करण्यात आली होती. मात्र, हे मनाई आदेश झुगारत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाण्यामध्ये दहीहंडी फोडली आहे. यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.
सर्व सण साजरे झालेच पाहिजे
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सर्व सण उत्साहात साजरे झालेच पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. ते म्हणाले की, राज्यामध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे. यात्रा काढल्या जात आहेत, मेळावे होत आहेत. बिल्डर कामे करून घेण्यासाठी सरकारच्या लोकांना भेटत आहेत. त्यातून कोरोना पसरत नाही, मात्र सण-उत्सव आले की कोरोना पसरतो. हे सर्व जाणीवपूर्वक केले जातेय. सर्व सण साजरे झालेच पाहिजेत. सरकारला नियम लावायचेच असतील तर सगळ्यांसाठी एकच नियम लावायला हवा. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला एक नियम असे चालणार नाही.’
…अन्यथा घंटानाद आंदोलन करु
मंदिरे उघडण्याविषयी राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले. मंदिरांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘मंदिरे उघडण्यात आलीच पाहिजेत. आजचा दिवस जाऊ द्या. यानंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करूच. सर्व मंदिरे उघडलीच पाहिजेत अन्यथा सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू,’ असा इशाराच त्यांनी दिला. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, घराबाहेर पडायला यांना भिती वाटते, त्यात आमचा काय दोष?