मुंबई- रिपब्लिक टिव्हीचा मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग च्या केस संदर्भात आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार असताना , दुसरीकडे त्यावर ३५३ चा गुन्हा पुन्हा दाखल केलेला असताना आता, विधिमंडळाने त्यांस बजावलेल्या विशेषाधिकार भंग समितीच्या कामकाजाला गुरुवारी प्रारंभ झाला. या विशेषाधिकार भंग नोटीसच्या संदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती झाली आहे.अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही चर्चेत मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केला होता. अशा पत्रकाराविरोधात हक्कभंग दाखल करा अशी मागणी करणारा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला होता. तर विधान परिषदेत काँग्रेसचे भाई अशोक जगताप आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी मांडला होता. दोन्ही सभागृहांत हे प्रस्ताव स्वीकारण्यात आले होते. आतापर्यंत हक्क भंग समितीने अर्णब गोस्वामी यांना दोन नोटीस बजावल्या आहेत.
या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हक्कभंग दाखल झाल्यावर समितीच्या कामकाजाला सुरवात होते. त्यानुसार पहिली बैठक झाली. या समितीचे कामकाज व अहवाल जाहीर करता येत नाहीत. पण समितीची शिफारस येईल त्या आधारावर पुढील कारवाईचा विषय ठरतो. कारवाईचा अहवाल गोपनीय असतो असे पटोले म्हणाले.