मुंबई, दि. २३ ऑक्टोबर –शिवसेना नेते संजय राऊत यांनी आधी आपल्या पाठिचा कणा शिल्लक आहे का याचा विचार करावा. कारण शिवेसनेने सत्तेसाठी लाचार होऊन कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसशी हातमिळवणी करुन आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीचा ताठ कणा आता सपाट झाला आहे असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगाविला आहे.
प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र केवळ शिवसेनेचाच आहे या भ्रमातून त्यांनी बाहेर यावे. महाराष्ट्राची काळजी येथील प्रत्येक नागरिकाला आहे. भाजपाला महाराष्ट्राची काळजी आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेमका कोणामुळे बदनाम होतोय याचा राऊत यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्याच्या चौकश्या सुरु आहेत, कोणा मंत्र्यांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी पडत आहे, तर कोणा मंत्र्याला चौकशीसाठी समन्स बजावले जात आहेत, मग ही सरकारची बदनामी नाही का… मग या बदनामीला कोण कारणीभूत आहे असा सवालही दरेकर यांनी केला.
आपले अपयश झाकण्यासाठी दुसरीकडे बोट दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या शिवसेनेकडून होत आहे. तपास यंत्रणा चुकीच्या गोष्टीपासून महाराष्ट्राला वाचवित आहेत. महाराष्ट्राला बदनाम होण्यापासून वाचवित आहेत. पण राज्य सरकारने त्यांच्यापाठीशी ठामपणे उभे राहण्याएवजी त्यांच्यावरच आरोप करण्यात येत असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर टिका करताना कावळे, डोमकावळे असे शब्दप्रयोग केल्याशिवाय त्यांना गरळ ओकल्याचे समाधान मिळत नाही अशी टिका करतानाच ते म्हणाले की, दिल्लीमधील राऊत यांच्या बंगल्यावर मोर आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्या दिल्लीतील बंगल्यावर दरदिवशी मोरांचे दर्शन होत असेल. मोर नाचला की लांडोर पण नाचते अशी जी म्हण आहे, तश्याच प्रकारे राऊत यांचे सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रवचन सुरु असते व त्या माध्यमातून त्यांचा थयथयाट रोज पाहायला मिळतो असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना महाराष्ट्राबाहेर दादर-नगर हवेलीची निवडणूक लढवित असून त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, दादर-नगर हवेलीमध्ये निवडणुक लढविण्या-या शिवसेनने आधी मुंबई- महाराष्ट्रामधील दादर व नगरची काय परिस्थिती आहे याकडे लक्ष द्यावे. सध्या महाराष्ट्रात शिवेसेनेच्या पक्षविस्ताराची काय स्थिती आहे. याचे बहुधा राऊत यांना भान दिसत नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.