सोलापूर- आमचे सरकार आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना 75 टक्के जागा राखीव ठेवू, याबाबतचा कायदाच आम्ही करणार. अशी घोषणा अजित पवारांनी केली. यासोबतच विधानसभा निवडणुकीत आपला 30 वर्षांचा अनुभव पणाला लावून 175 जागा जिंकू, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. ते आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीने आमच्यासोबत यावे, लोकसभेला वंचितमुळे 12 जागांवर फटका बसला. तसा तो दोघांनाही फटका बसलाय, त्यामुळे विधानसभा एकत्रित लढवावी, तसेच याकाळात विरोधकांनी समंजसपणा दाखवणे गरजेचे असल्याचेही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना भाजपात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण त्यांनी नकार दिल्यानंतर आयकर विभागाच्या धाडी टाकण्याचे कट कारस्थान भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.