केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र व यशस्वी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी
पुणे : दिनांक २५ सप्टेंबर २०२१ : स्वजाणिवा विकसित झालेल्या युवकांमुळेच राष्ट्रनिर्माण होते असे मत प्रसिद्ध पत्रकार,लेखिका व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यकारी प्रमुख स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र व यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर पुणे येथे आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवनचरित्र व देश कार्य या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक व्यक्ती सजग होणे ही काळाची गरज आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली एकात्म मानवतावादाची संकल्पना आजही केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला कशी आवश्यक आहे हे तालिबानमधील अराजकतेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आचरणाबद्दल कमालीची सजगता बाळगायला हवी तसेच आपल्या हातून घडलेल्या चुकीच्या वर्तनाची टाचणी मनाला लागायला हवी असे सांगत महाळंक यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे दाखले दिले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी सांगितले की,युवकांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवनचरित्र वाचून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी तसेच त्यांनी याप्रसंगी नेहरू युवा केंद्रांच्या विविध उपक्रमांची संक्षिप्त माहिती सांगितली.
यावेळी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी स्किल सेंटरच्या दोन विद्यार्थिनींचे त्यांनी गणेशोत्सवात दहा हजार मोदक तयार करून त्याची यशस्वी विक्री केल्याबद्दल विशेष सन्मानचिन्ह देऊन दोघींना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश रांगणेकर यांनी तर आभार प्रदर्शन यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले.