नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेकड म्हटले ते चीनसमोर उभे राहू शकत नाहीत. त्यांनी लडाखमधील फिंगर 3 ते 4 दरम्यानची जमीन चीनला दिली. तर फिंगर 4 पर्यंत भारताची पवित्र भूमी होती. मोदींनी चीनसमोर हात टेकले आहेत.असा आरोप आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केला .
राहुल पुढे म्हणाले की, चीनच्या सैन्याने डेप्सांग या मोक्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. चिनी सैन्य अजूनही तेथे आहे. संरक्षणमंत्र्यांनी याबद्दल सभागृहात एक शब्दही काढला नाही. भारत सरकार आमची पवित्र जमीन चीनला देत आहे. पंतप्रधान मोदी आपल्या सैन्याचा अपमान करीत आहेत. ते आपल्या सैन्याच्या बलिदानाचा विश्वासघात करीत आहेत. भारतात कोणालाही तसे करण्यास परवानगी दिला जाऊ नये.
सेना तयार आहे, पण मोदी नाही
राहुल म्हणाले की, आपले सैन्याचे जवान चीनला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार आहेत. मात्र पंतप्रधान असे होऊ देत नाहीत. पंतप्रधान 100% भेकड आहेत. आपले लष्कर, हवाई दल आणि नौदल चीनचा सामना करण्यास तयार आहेत, परंतु पंतप्रधान तयार नाहीत, हीच मोठी अडचण आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी संरक्षणमंत्र्यांवरही निशाणा साधाला. संरक्षण मंत्री सभागृहात म्हणतात की दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली आहे. ते आपले मोठे यश आहे. पण मी याला अपयश मानतो. घर आपले आहे. ते (चीन) परवानगी न घेता आपल्या घरात घुसले आणि त्यांना पळवून लावण्याऐवजी त्यांनी आपण आपली जागा दिली. हे आपले कसले यश? आपण त्यांना आपले घर दिले. हे चीनचे यश आहे.