पंढरपूर दि. ३० : कोरोनामुळे देशातील तसेच राज्यातील नागरिक विविध ठिकाणी अडकून बसले आहेत. असेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे नागरिक मथुरा येथे अडकल्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना दि. २७ मार्च, २०२० रोजी दूरध्वनी द्वारे हभप श्री वास्कर महाराज व श्री उखळीकर महाराज पंढरपूर यांनी कल्पना दिली. यांसदर्भात उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ उपसभापती कार्यालयीन खाजगी सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी यांना अडकलेल्या वारकऱ्यांना सोडविण्याबाबत उपयोजन करण्यास आदेश दिले. त्यानुसार या अधिकारी यांनी दि २७ पासून उत्तरप्रदेश गृहविभाग, जिल्हाधिकारी मथुरा, तसेच मध्यप्रदेश गृहविभाग यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करण्यात आले.
या वारकाऱ्यांना प्रवास करण्यासाठी कोणाकडे संपर्क साधायचा याबाबत काहीच ज्ञान नव्हते, वृन्दावन मथुरा येथून निघण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, रस्त्यात रहाण्याची व्यवस्था नव्हती तसेच विविध राज्याच्या प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य नसल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते. परंतु डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती यांनी त्यांना धीर दिला आणि प्रशासनांशी संवाद साधून त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व सातत्याने तसे काम केले। उपसभापती कार्यालयाच्या पाठपुराव्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना मदत मिळण्यास सुरवात झाली आणि त्यांना मायेची साथ मिळाल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले. या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवाससाठी दोन ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली तर यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काल दि. २९ मार्च, २०२० रोजी त्यांचे वृन्दावन येथे हेल्थ चेकअप करून त्यांना उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात आणण्याबाबतच्या प्रवासाची परवानगी मिळाली. यात उपसभापती कार्यालयातील अधिकारी सचिन चिखलीकर हे वारकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांना मायनगरीत आणण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. आज दि. ३० मार्च, २०२० रोजी पहाटे त्यांचे परळी वैजनाथ येथे आगमन झाले असून त्यांचे तेथे पुन्हा मेडिकल चेकअप केले जात असून त्यांना मेडिकल अधिकारी यांच्या निगरानी ठेवण्यात आले असून लवकरच त्यांचे पंढरपूर येथे आगमन होईल. या संपूर्ण संवेदनशील वातावरणात डॉ नीलम गोऱ्हेनी वारकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना महाराष्ट्र मध्ये आणण्यात केलेल्या प्रयत्नाबद्दल वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.