४३ लाखांपैकी १ लाख ४० हजार मीटरची तपासणी पूर्ण
मुंबई, दि. १३ ऑगस्ट २०२१: घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे शून्य ते ३० युनिटपर्यंत सुरु असलेल्या वीजवापराची खात्री करण्यासाठी गेल्या महिन्यापासून महावितरणकडून वीजमीटर तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत १ लाख ४० हजार २८८पैकी २२ हजार ६०३ मीटरमधील वीजवापर विविध कारणांमुळे चुकीचा नोंदविला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधीत मीटर तत्काळ बदलून प्रत्यक्ष वीजवापराप्रमाणे अचूक वीजबिल देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी ग्राहकांचा वीजवापर व महसूलवाढीसंदर्भात घेतलेल्या आढाव्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ४२ लाख ९३ हजार वीजग्राहक दरमहा शून्य ते ३० युनिटपर्यंत विजेचा वापर करीत असल्याचे दिसून आले. हे ग्राहक प्रामुख्याने शहरी, निमशहरी भागातील आहेत व एवढा कमी वीजवापर असल्याने त्याची खात्री करण्यासाठी सर्व परिमंडलामध्ये वीजमीटर तपासणीची विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश श्री. सिंघल यांनी दिले आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत १ लाख ४० हजार २८८ वीजमीटरची तपासणी करण्यात आली आहे.
घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजमीटरची क्षेत्रीय पथकांनी प्रत्यक्षात तपासणी केल्यानंतर आतापर्यंत २२ हजार ६०३ मीटरमध्ये विविध कारणांनी योग्य रिंडिग होत नसल्याचे दिसून आले आहे. तर यातील ८४९ मीटरमध्ये ग्राहकांनी फेरफार केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचे कलम १३५ नुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मीटरची गती संथ असणे, मीटर बंद असणे, डिस्प्ले नसणे, योग्य भार नसणे आदी सदोष प्रकार उर्वरित मीटरमध्ये आढळून आले आहे. हे सर्व मीटर महावितरणकडून तत्काळ बदलण्याची कार्यवाही सुरु असून प्रत्यक्ष वापराप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहेत.
ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापराप्रमाणे अचूक बिल देण्यासाठी महावितरणने मोबाईल अॅपद्वारे मीटर रिंडींग सुरु केले आहे. कंत्राटदारांकडून मीटर रिडींग योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यासाठी दरमहा सरासरी २ टक्के रिडींगचे पर्यवेक्षण केले जाते. सोबतच या मोहिमेमुळे देखील वीजग्राहकांना अचूक वीजबिल देण्यास गती मिळत आहे. सदोष मीटर किंवा रिडींगमुळे जादा युनिटचे वीजबिल आल्यास त्यासंबंधीच्या तक्रारी वीजग्राहकांकडून तत्काळ केल्या जातात. तर याच कारणामुळे कमी युनिटचे वीजबिल येत असल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. मात्र मीटर बदलून दिल्यानंतर संबंधीत ग्राहकांच्या वीजबिलात मागील वीजवापराच्या युनिटचे देखील नियमाप्रमाणे समायोजन करण्यात येणार आहे. तसेच दोषी आढळलेल्या संबंधीत मीटर रिडिंग एजन्सीविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यालयातून देण्यात आले आहेत.
शून्य ते ३० युनिटपर्यंत वीजवापराच्या तपासणीमध्ये आतापर्यंत औरंगाबाद प्रादेशिक विभागात २९हजार४०७ पैकी ६ हजार४९१, कोकण प्रादेशिक विभागात ५२हजार२१४ पैकी ६ हजार९२०, नागपूर प्रादेशिक विभागात ३८हजारपैकी ५हजार१९० आणि पुणे प्रादेशिक विभागात २०हजार६६५ पैकी ४हजार वीजमीटरमध्ये अनियमितता दिसून आली आहे. त्याबाबत तत्काळ कार्यवाही करून वीजग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापराप्रमाणे अचूक वीजबिल देण्यात येत आहे.