प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचा कर्मचारी संघटनांशी संवाद
पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2021: वीजबिलांच्या वसुलीवरच आर्थिक भिस्त असताना बिलांचा भरणा होत नसल्याने महसूलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे महावितरणवरील आर्थिक संकट सध्या अतिशय गंभीर झाले आहे. अशा स्थितीत महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासाठी वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्याशिवाय पर्याय नाही. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आर्थिक संकटाची वीजग्राहकांना माहिती देऊन थकबाकीची एकजुटीने वसुली करावी असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना केले.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या मंडल ते प्रादेशिकस्तरावरील सुमारे 135 पदाधिकाऱ्यांशी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी (दि. 23) संवाद साधला. सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक संकटाचे आव्हान परतून लावण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत. प्रादेशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत 1690 कोटी 55 लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सर्वच कार्यालयातील अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत कार्यालयीन सुटीच्या दिवशी देखील वीजबिल वसुली मोहिमेत सहभागी होऊ व महावितरणला आर्थिक संकटातून मुक्त करू अशी ग्वाही दिली.
वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने थकबाकीदारांचा नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. यामध्ये काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालयाच्या तोडफोडीचे प्रकार होत आहे. अशा आरोपींविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाईसाठी महावितरण आग्रही आहे. त्यासाठी कायदेशीर पाठपुरावा करण्यासोबतच असा प्रकार घडल्यास सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी व्यवस्थापन खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अनेक ठिकाणी वीजबिलांच्या वसुलीसोबतच कृषी धोरण 2020 अंतर्गत कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या वेगाने कार्यान्वित केल्याबद्दल श्री. नाळे यांनी अभियंता, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ‘कोरोना’ काळातील वीजबिलांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही बिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्याचे निरसन करण्याची सोय संबंधीत कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच थकबाकीचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
या संवाद कार्यक्रमात अधीक्षक अभियंता (संचालन) श्री. शंकर तायडे, उपमहाव्यवस्थापक (मासं) श्री. अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे), श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व श्री. भूपेंद्र वाघमारे (कोल्हापूर) यांच्यासह सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स, इलेक्ट्रिसीटी वर्कर्स फेडरेशन, विद्युत श्रमिक कॉग्रेस इंटक, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी, वीज कामगार कॉग्रेस इंटक, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, अधिकारी संघटना, वीज तांत्रिक कामगार संघटना, बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम, कार्यालयीन कर्मचारी संघटना, वर्कर्स युनियन, राष्ट्रवादी वीज कामगार कॉग्रेस, भारतीय कामगार सेना, नवनिर्माण वीज कर्मचारी जनाधिकार सेना, लाईन स्टाफ असोशिएशन आदी संघटनांचे प्रादेशिक, परिमंडल व मंडलस्तरीय पदाधिकारी सहभागी झाले होते.