पुणे : महावितरण व महापारेषणच्या अधिकार्यांकडे जनतेला अधिक पायपीट करण्याची गरज पडू नये म्हणून दोन्ही कंपन्यांमध्ये धोरणात्मक सुधारणा करण्याची गरज असून जनतेच्या तक्रारी कायदेशीर असतील तर त्या तात्काळं सोडवल्या गेल्या पाहिजेत, असे निर्देश ऊर्जामंत्री .चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महावितरण व महापारेषणच्या प्रशासनाला दिले.
पुणे येथील महावितरणच्या रास्तापेठ कार्यालयाच्या परिसरात इतिहासात प्रथमच ऊर्जामंत्र्यांनी नागरिक, ग्राहक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री.संजय ताकसांडे, महापारेषणचे संचालक (संचालन) श्री.ओमप्रकाश एम्पाल, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.रामराव मुंडे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.नागनाथ इरवाडकर तसेच पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.आर.एन. म्हस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, जोपर्यंत सर्वांना शाश्वत वीज मिळत नाही तोपर्यंत या विभागात सुधारणा झाल्या असे म्हणता येत नाही. केवळ सुधारणा करून भागणार नाही, तर आमुलाग्र परिवर्तन करावे लागणार आहे. यासाठीच आपण राज्याच्या कानाकोपर्यात जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुमच्या तक्रारींचा दखल घेतली नाही तर मला मेसेज पाठवा, असे आवाहन करूंन ऊर्जामंत्र्यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला आपला मोबाईल नंबर दिला.
ते म्हणाले, पुढच्या काळांत शेतकर्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी सौर कृषीपंपाचा निर्णय या शासनाने घेतला आहे. सरकारला सहकार्य करा. 1200 कोटी रुपये थकित बिल न भरणे योग्य नाही. दंड, व्याज देऊ नका, पण मूळ रक्कम भरा. त्यामुळे तुमच्या भागातच तो निधी खर्च करू. जनतेत जाऊन काम करणारे हे सरकार आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय आम्ही कामच करू शकत नाही, असे सांगून अधिकार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री श्री.बावनकुळे यांनी केले.
या संवाद कार्यक्रमात नागरिकांनी वीजबिल वेळेवर न येणे, अवाजवी बिल मिळणे, वीजपुरवठा खंडित होणे, वेळेवर वीजजोडणी न मिळणे, पायाभूत सुविधा आराखड्यांतील कामांचा दर्जा, वीजचोरी, ऊस जळिताची नुकसानभरपाई आदी तक्रारी मांडल्या. या सर्व तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री श्री.बावनकुळे यांनी महावितरण-महापारेषणच्या प्रशासनास दिले. सहा महिन्यांनी येथे पुन्हा संवाद कार्यक्रम घेणार आहे. त्यावेळी ग्राहकांच्या या तक्रारींचे निराकरण झालेले दिसले पाहिजे, असे श्री.बावनकुळे म्हणाले. महावितरणच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दौरे करून पायाभूत सुविधा आराखड्यातील कामे नियमित करून घ्यावीत, असे निर्देशही श्री.बावनकुळे यांनी दिले.