पुणे: थकबाकीच्या वसुलीसाठी महामोहीम सुरु असतानाच वसुलीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याविरोधात महावितरणने कठोर कारवाई सुरु केली आहे. थकबाकीचा सर्वाधिक डोंगर असणाऱ्या औरंगाबाद, लातूर, नांदेड, जळगाव आदी परिमंडलात आतापर्यंत 9 अधिकारी व कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे तर 40 जणांपेक्षा अधिक जणांना थकबाकीची अपेक्षित वसुली न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.
महावितरणची आर्थिक परिस्थिती सद्यस्थितीत अतिशय बिकट आहे. 100 टक्के चालू वीजबिल तसेच थकबाकीची मोठ्या प्रमाणात वसुली करण्याशिवाय तरणोपाय नसल्याने राज्यभरात थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात स्थानिक पातळीवर वसुली पथके गठीत करून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या कामावर देखरेख करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातून निरीक्षक पाठविण्यात आलेले आहेत.
गेल्या काही महिन्यांत चालू वीजबिल व थकबाकीची वसुली अपेक्षित असलेल्या 4000 कोटींपेक्षा अधिक झालेली नाही. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या संचालन व सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. महावितरणच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्गीत करण्यात आले आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. याशिवाय कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आदी वीजग्राहकांना थकबाकीमुक्त करण्यासाठी नवप्रकाश योजनाही सुरु आहे.
संचालन व सुव्यवस्थेवरील अत्यावश्यक खर्चासाठी महसुलात वाढ करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतरही अनेक भागात थकबाकी वसुलीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. थकबाकी वसुलीमध्ये कोणतीही प्रगती नाही किंवा आहे त्यापेक्षाही थकबाकीचे प्रमाण वाढत आहे अशा कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांविरोधात महावितरणने कारवाई सुरु केलेली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, लेखा अधिकारी, तंत्रज्ञ अशा नऊ जणांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 4 कार्यकारी अभियंत्यांसह 39 अतिरिक्त कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी, सहाय्यक अभियंता आदींना तसेच नांदेड परिमंडलातील 4 कार्यकारी अभियंता आणि लेखा अधिकार्यांना अपेक्षित प्रमाणात वीजबिल व थकबाकी वसुली न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
महावितरणने मानवी हस्तक्षेप टाळणार्या मोबाईल अॅपद्वारे मीटर रिडींगची अत्याधुनिक व्यवस्था सुरु केलेली आहे. त्यामुळे फॉल्टी, सरासरी रिंडीग असलेल्या वीजमीटरचे नियमित रिडींग सुरु झालेले आहेत. मीटर रिडींगमध्ये थेट वसुलीवर परिणाम होणारे दोष हेतुपुरस्सर असल्याचे दिसून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसेच विजबिलाबाबत तक्रारी असल्यास त्याचे त्वरीत निराकरण करण्याचे निर्देश प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत.