सामनाच्या कार्यकारी संपादकांनी पुणेकरांना दोष देताना प्रशासनाचे काय चुकले त्याचे निष्पक्ष परीक्षण करावे……
पुणे-आजच्या दैनिक सामना तून ‘पुण्याने हे ही करुन दाखवले,गव्यास मारुन दाखवले’ असा अग्रलेख लिहून संपादक महाशयांनी पुणेकरांवर अश्लाघ्य टीका करतानाच गव्याच्या दुर्दैवी मृत्युचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडले की त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील*जबाबदार असा एक ट्रेंड सुरु झाला असून हा सत्ताधाऱ्यांच्या वैफल्याचा आणि बौद्धिक दिवाळखोरीचा निदर्शक आहे असे मत भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
मुळात एक गवा वाट चुकल्यामुळे पुण्याच्या दाट लोकवस्तीत येतो,तेथे बघ्यांच्या गर्दीला बघून बिथरतो,सैरा वैरा पळतो,महत्प्रयासाने वनविभागास त्याला पकडण्यात यश मिळते पण दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडतो ह्या सर्वात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा संबंध काय ? किंबहुना चंद्रकांतदादा हे सकाळी ६:३० पासून वनविभाग,मनपा प्रशासन व भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते व संपूर्ण कार्यवाहीवर लक्ष ठेवून होते.त्याचे कौतुक किंवा उल्लेख राहिला बाजूला आणि अनावश्यक अग्रलेख लिहून पुणेकरांना डिवचण्याचे काम मात्र सामनाच्या कार्यकारी संपादक महोदयांनी करुन दाखवले आहे.पुण्यात शिरलेल्या गव्यावर आधी कुत्र्यां नी हल्ला केला व मग लोकांनी मारले असे लिहितानाच पुण्यातील लोक वाघापेक्षा शूर झालेले दिसतात.त्यांनी एकट्यादुकट्या गव्यास ठार केले आहे.कोव्हिड १९ व लॉकडॉउन काळात जास्तच आराम lफर्मावल्यामुळे पुणेकरात हे जे हत्तीचे बळ संचारले आहे त्याची दखल सरकारने वेळीच घ्यावी हे बरे.असा शहाजोग सल्ला देतानाच मा.संजय राऊत म्हणतात आपले पुणेकर दोन पावले पुढेच आहेत,शौर्य दाखविण्याच्या धुंदीत ते इतके निर्घृण झाले की चुकुन शहरात घुसलेल्या रानगव्यास हाल हाल करुन मारले.
संजय राऊत साहेबांनी अग्रलेख लिहिण्यापूर्वी आणि पुणेकरांना दोष देताना वनखात्याची SOP म्हणजेच गवा मानव संघर्ष झाल्यास करावयाच्या कारवाईचा अभ्यास केला असता तर असा अग्रलेख लिहिताना आपण आपल्याच सरकारच्या पोलिस,पर्यावरण आणि वन खात्याचे वाभाडे काढत आहोत हे त्यांच्या लक्षात आले असते.मानवी वस्तीत गवा घुसल्यास त्याला पहिले त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी रस्ता रिकामा करुन देणे आवश्यक आहे,तसेच मानवी हस्तक्षेप व गर्दी टाळण्यासाठी त्वरित कलम १४४ लावून सर्व भाग निर्मनुष्य करणे गरजेचे आहे असे यासंदर्भातील क्षेत्रीय कार्यवाहीसाठीच्या दिशानिर्देशात स्पष्टपणे नमूद केले आहे.असे कोथरूड मधे का घडले नाही ? याला जबाबदार कोण याची चौकशी झालीच पाहिजे.तसेच संपादक महोदयांनी वन विभागाचे कर्मचारी प्रशिक्षित होते का असा प्रश्न उपस्थित केला आहे – ते प्रशिक्षित होतेच सोबत महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य श्री.अनुज खरे व इतर अधिकारी ही होते,मात्र गर्दी मुळे त्यांनी योग्य कार्यवाही करण्यात अडचणी येत होत्या आणि तीच खरी मेख आहे.शेवटी एखादा प्राणी आला की हौशे नवशे गवशे गर्दी करतातच,मोबाईल युगात फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर टाकणे याची ही स्पर्धा असतेच, यात पुणेकरांचा जसा काही अंशी उत्साह आहे तसाच गर्दीला आवर घालण्यात प्रशासन कमी पडले हे निर्विवाद सत्य ही संजय राऊत साहेबांनी स्वीकारावे,आत्मपरीक्षण करावे आणि मग या विषयात राजकारण करावे किंवा पुणेकरांना दोष द्यावा.असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.
खा.संजय राऊत यांनी गवा मानव संघर्ष निर्माण झाल्यास करावयाची कार्यवाहीचा अभ्यास करावा – संदीप खर्डेकर.
Date:

