मुंबई | प्रतिनिधी
मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या 6 जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि वादळी हवामानाचा धोका कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सध्या हाय अलर्ट लागू करण्यात आला असून हवामानातील बदल लक्षात घेता प्रशासनाकडून दर तीन तासांनी हवामानाचा अलर्ट जारी केला जात आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-ठाण्यात शाळांना सुट्टी
मुंबई, ठाणे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. उपनगरी रेल्वे सेवेलाही काही प्रमाणात फटका बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने मुंबई आणि ठाण्यातील शाळा तसेच काही भागातील महाविद्यालयांच्या सत्रांना सुट्टी जाहीर केली आहे.
वसईत अनेक भाग जलमय
मुंबई महानगर प्रदेशातील वसई परिसरात अनेक रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी नदी, नाले, समुद्रकिनारे आणि पाणी साचणाऱ्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खड्ड्यांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “जिथे रस्ते जोडले जातात, त्या ठिकाणी दोन खड्डे पडले आहेत. संपूर्ण रस्ता खराब झालेला नाही. अंतिम लेअर टाकण्यापूर्वी काही तांत्रिक बाबींची तपासणी केली जाते. आवश्यक दुरुस्ती एमएसआरडीसीकडून केली जाईल. केवळ टीका करण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे.”
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाकडून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अधिकृत सूचना आणि हवामानाचे अलर्ट लक्षात घेऊनच प्रवास करावा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

