पुणे-नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आरोपीच्या शिक्षेवर कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू असताना विशेष न्यायालयाने अत्यंत कडक निरीक्षण नोंदवले. “हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ, घृणास्पद आणि अमानवी आहे,” अशा शब्दांत न्यायालयाने या कृत्याचा तीव्र निषेध केला. तर दुसरीकडे, सरकारी वकिलांनी नराधम भीमराव कांबळेच्या क्रूरतेचा पाढा वाचत, समाजात असा दाखला बसावा यासाठी त्याला केवळ आणि केवळ ‘मृत्युदंडाची’ (फाशीची) शिक्षा देण्याची आक्रमक मागणी केली.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खून खटल्यात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी ठरवले. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला थेट पिंजऱ्यात उभे करून, “तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे?” असा थेट सवाल केला. त्यावर या निर्लज्ज नराधमाने कोर्टातही स्वतःचा बचाव करत अपघाताचा खोटा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

