चंद्रपूर-येथील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहाणी होण्याची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणीही वाढली होती. त्यानंतर वनविभागाने केलेल्या तपासात हा हल्ला टी-2 नामक वाघिणीने केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून तिचा माग काढणे सुरू होते. अखेर शनिवारी रात्री वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना टी-2 वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, पवनपार बीट कक्ष क्रमांक 282 मध्ये ही कारवाई करण्यात आली. टी-2 वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश प्राप्त होताच वन विभागाच्या विशेष पथकाने जंगल परिसरात तिचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. या पथकाने शनिवारी रात्री 7.15 च्या सुमारास ट्रॅन्क्युलायझर डार्टद्वारे एका वाघाचा वेध घेतला. सुरुवातीला अंधारामुळे डार्ट लागलेला वाघ हल्लेखोर वाघीण आहे किंवा नाही याविषयी संभ्रम होता. पण त्यानंतर सदर वाघ ही नरभक्षक टी-2 वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 8 च्या सुमारास तिला जेरबंद करण्यात आले.
विशेष म्हणजे ही कारवाई झाली त्यावेळी टी-2 वाघिणीचे बछडे तिच्यासोबत नव्हते. त्यामुळे त्या बछड्यांचा वनविभाग स्वतंत्रपणे शोध घेणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या घटनेप्रकरणी विरोधकांनी सरकार व वन विभागावर टीकेची झोड उठवली होती. वाघिणीच्या हल्ल्यात 4 निष्पाप भगिनींचा झालेला मृत्यू ही केवळ दुर्घटना नव्हे, तर तो प्रशासकीय अनास्थेने केला घात आहे. हे सरकार नक्की कुठे झोपले आहे? ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनता पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जाते. त्यांना सुरक्षा देणे हे वन विभागाचे आणि सरकारचे कर्तव्य नाही का? असा सवाल विरोधकांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.
गतवर्षी गेला होता 3 महिलांचा बळी
गुंजेवाहीच्या घटनेमुळे गतवर्षीच्या मेंढा (माल) घटेनच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. गतवर्षी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा (माल) जंगलात वाघाने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर हल्ला केला होता. त्यात 3 महिलांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर मोठे राजकारण झाले होते. वन विभागाला नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता गुंजेवाहीच्या जंलगात 4 महिलांचा बळी गेल्यामुळे स्थानिकांच्या रोषाचा कडेलोट झाला आहे.

