मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यात सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजप सर्वाधिक 12 जागांवर निवडणूक लढवेल. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 3 व 2 जागांवर समाधान मानावे लागेल. पण महायुतीत 1-2 जागांवर वाद सुरू असल्याची माहिती आहे. शिंदे गटाने विधान परिषदेच्या 6 जागांची मागणी केली आहे. पण भाजपने त्यांना केवळ 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पक्षाचे गाऱ्हाणे मांडणार आहेत.
विधान परिषदेच्या जागावाटपाच्या मुद्यावर राज्यात तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपश्रेष्ठींची भेट घेण्यास प्राधान्य दिले आहे. अमित शहांसोबतच्या बैठकीत शिंदे पक्ष विस्ताराच्या मुद्यावर अर्थात ‘ऑपरेशन टायगर’वरही चर्चा करण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिवसेनेमध्ये बहुतांश जागांवर मतैक्य झाले आहे. पण ठाण्याच्या जागेवर घोडे अडले आहे. भाजप या जागेसाठी आग्रही आहे. तर शिवसेनेने ठाणे आपला बालेकिल्ला असल्याचे सांगत त्यावरील दावा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पेच फसला आहे. शिंदे गटाने या प्रकरणी जागांची अदलाबदली करण्याचा आग्रह धरला आहे.
भाजपने ठाणे विधान परिषदेच्या जागेवर जोरदार दावा केला आहे. या ठिकाणी भाजप नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह भाजप आमदार संजय केळकर यांनी धरला आहे. ठाण्यात सध्या भाजपचे 444 नगरसेवक आहेत. त्या तुलनेत शिवसेना व जिजाऊ संस्थेकडे केवळ 346 सदस्य आहेत. महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत आहे. भाजप या ठिकाणी ठाण्याचाच उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. संजय केळकर यांच्या या भूमिकेला साजेशी भूमिका भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतल्यामुळे या जागेवरून महायुतीत फटाके फुटण्याची शक्यता आहे.
भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर ते म्हणाले होते, सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्यांनाच देण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळीही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. पण आता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला गेल्यामुळे जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे.

