काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना ; दोनदिवसीय पाहणी दौऱ्याची सांगता
पुणे, दिनांक – 15 मे 2026
दर वर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि विना अडथळ्यांची व्हावी, या उद्देशाने श्रद्धा व आधुनिकतेचा प्रभावी संगम साकारत पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-965 जी) कामाचे आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-965 जी) हा पाटस ते पंढरपूर असा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा 3 पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम 96% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम 84% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. सदर काम वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच यंदाच्या वारीत वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशा पद्धतीने हे काम करण्यात यावे, असेही ते म्हणाले.
हा महामार्ग बारामती, भिगवण, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना बायपास करून जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच या मार्गावरही स्वतंत्र पदयात्रा मार्ग, आधुनिक पूल, अंडरपास आणि बायपास मार्गांच्या सहाय्याने यात्रा अधिक सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर पालखी मार्गावर पॅकेज क्र. 2 व 3 वर सुमारे 400 वृक्षांचे पुनर्स्थापन (ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीरीत्या करून त्यांचे संगोपन केले गेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज व श्रीपूर/बोरगाव याठिकाणी बायपास रस्ते प्रस्तावित केले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक जलद गतीने होईल.
महामार्गाच्या परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळपास 25 तलावांचे खोलीकरण करून अतिरिक्त जलसाठी निर्माण करण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या 25 गावांना याचा फायदा झाला आहे.
पालखी मार्गासंदर्भात ही माहिती देत असताना दिवंगत नेते अजित पवार यांची आठवण येत असल्याचे केंद्रीय मंत्री गडगरी यांनी सांगितले. अजित पवार यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करून घेतले होते. यामध्ये महामार्गाच्या कामासाठी जवळपास 2 लाख क्युबिक मटेरियल काढून वापरण्यात आले. पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाच्या इरिगेशन मधून कॉंक्रीटचा सांडवा तयार करून घेतला, अशी आठवणही त्यांनी सांगितली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने हिंगणगडा व कान्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग निर्माण करून वन्य प्राण्यांचे अधिवास जतन केले आहेत. त्यामुळे प्राणी व वाहनांच्या अपघाताला आळा बसला आहे.
गडकरी यांच्या आजच्या भेटीसोबतच त्यांच्या दोनदिवसीय पालखी मार्ग पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

