योजनेचा महिला शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ‘समाधान शिबीर’ आयोजित करावीत
पुणे.दि.१५: जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यामध्ये योजना अंमलबजावणी व लक्षांक साध्य करण्याकरिता करण्यात येत असलेल्या कार्यवाही अंतर्गत, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्ज वाढीकरिता विशेष मोहीम संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेअंतर्गत, आमदार व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला एकल महिला शेतकरी, शेतमजूर महिला, अपघातग्रस्त, आत्महत्याग्रस्त व प्रकल्पग्रस्त महिलांना लाभधारक योजनांमध्ये प्राधान्याने समाविष्ट करत त्यांच्यासाठी विशेष हेड करून किंवा त्या-त्या कामांमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या.
संयुक्त कुटुंब पद्धतीत महिलांना अधिकारांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांच्या नावावर जमीन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष समाधान शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत एम. एस. स्वामिनाथन फाउंडेशनची (दि.११मार्च) बैठक झाली होती आणि त्या बैठकीत राज्याच्या कृषी विभागाने महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासोबत एक करार देखील केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने केलेल्या उपक्रमांचा प्रभावी आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली आहे. राज्यातील महिला शेतकऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठीच्या धोरणात्मक मसुद्यावर काम करणे, या प्रक्रियेअंतर्गत विविध स्तरावरील भागधारकांशी थेट संवाद साधून पुण्यासाठीही व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आराखडा तयार करण्यात यावा.

