-माजी आमदार मोहन जोशी
पुणे : वाहतुकीची गरज लक्षात घेता, शिवाजीनगर ते हिंजवडी हा पूर्ण मेट्रो मार्ग त्वरीत सुरु व्हायला हवा, याकरीता भाजपच्या नेत्यांनी उदघाटनासाठी कोणा नेत्याची वाट बघत बसू नये, प्रवाशांची सोय पहावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शहरातील सध्या चालू असलेल्या दोन मेट्रो मार्गांचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते चार वेळा करण्यात आले. तसेच लोहगाव विमानतळ टर्मिनल दोन चे बांधकाम तयार असतानाही पंतप्रधान मोदी यांच्या सोयीसाठी उदघाटन लांबविण्यात आले. सरकारी खर्च प्रचंड करून उदघाटनाच्या निमित्ताने प्रसिद्धीची हौस भागवून घ्यायची, याची सवय भाजप नेत्यांना झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो सेवेचे उदघाटन कोणा नेत्यासाठी थांबवले आहे का? याची शंका येते असे मोहन जोशी यांनी सांगितले.
महामेट्रोच्या वेळापत्रकानुसार मार्च २०२६ पूर्वीच शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग पूर्ण होणे आवश्यक होते. मे महिना निम्मा झाला तरी शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावर मेट्रो धावू लागलेली नाही. जून महिन्यात १२ स्थानकांपर्यंत आणि ऑक्टोबर महिन्यात उर्वरित ११ स्थानकं, अशा दोन टप्प्यांमध्ये मेट्रो सेवा चालू करण्याचा विचार आसल्याचे समजते. मेट्रो मार्गाची चाचणी यशस्वी झाली असतानाही मेट्रो दोन टप्प्यात चालू करायची यामागे भाजपचा प्रसिद्धीचा हेतू आहे. तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत, ती पटण्याजोगी नाहीत. प्रशासनाच्या मते तांत्रिक बाबी पूर्ण करून ३१मे पूर्वीही संपूर्ण मार्गावर मेट्रो धावू शकते.
रखडलेली मेट्रो सेवा तातडीने सुरू करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात पाणी साठल्याने हिंजवडीतील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. ते लक्षात घेता, पावसाळ्यापूर्वीच मेट्रो सेवा चालू करणे गरजेचे आहे.

