मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहीजे, एवढा निर्लज्जपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही
मुंबई | शनिवारपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेसह भाजपवर निशाणा साधला.
‘एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहीजे. नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे केले आहेत, मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे’, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
तसेच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान निर्लज्जपणाचे, नाकर्तेपणाचे आहे. भ्रष्टाचारचा चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे. यापूर्वी कोणत्याच नेत्याने मुंबईकरांना असे उत्तर दिलं नाही, की तक्रार काय करता, याचं स्वागत करा. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसाठी जेव्हा महामार्गावरील गाड्या थांबवल्या जातील. तेव्हा मुख्यमंत्री बोलतील, ‘तुम्ही गर्दीत अडकलाय, तक्रार काय करता. माझं स्वागत करा.’ एवढा निर्लज्जपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही,’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.