ऑल इंडिया इंटलेक्च्युअल फोरम, पुणेचे अध्यक्ष डॉ. एस.एन.पठाण यांचे आवाहन
पुणे, 24 जूनः आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद असल्याने मुस्लीम बांधवांनी महाराष्ट्रातील 20 लाख वारकर्यांचा व समग्र महाराष्ट्र जनतेचा सन्मान करण्यासाठी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवार 30 व शनिवार 31 जून रोजी साजरी करावी. तसेच महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम मध्ये सौहार्दाचे वातावरण ठेवावे. असे आवाहन ऑल इंडिया इंटलेक्च्युअल फोरम, पुणे चे अध्यक्ष विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणेचे सल्लागार व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम इंटलेक्चुअल फोरम, पुणेचे सचिव माजिद पैठणकर व वहिदा अलम मुलाणी उपस्थित होत्या.
डॉ. पठाण यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर माऊलींनी चौदाशे वर्षापूर्वी आता विश्वात्मके देवे असे म्हणून ईश्वराकडे पसायदान मागितले. संत तुकाराम महाराजांनी विष्णूदास जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असे म्हणून भारतातील जाती पातीवर पहिला आसूड ओढला. म्हणून अनेक मुस्लीम संत वारकरी संप्रदायाकडे आकर्षीत झाले. त्यातूनच श्रीगोंदा येथील महंमद महाराज व जैतूनबी या मुस्लीम संतांच्या वारकरी दिंडी आजही त्यांची परंपरा चालू ठेवतात. असा समृध्द हिंदू मुस्लीमांच्या बंधुभावाचा वारकरी संप्रदायाचा इतिहास असतांना मुस्लीम बांधवानी गुरूवारी 29 जून रोजी आषाढी एकादशी दिवशी बकर्याची कुर्बानी देणे अत्यंत गैर आहे.
बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी 29 जून रोजी येत आहे. बकरी ईद चे वैशिष्टे म्हणजे ज्या मुस्लीम बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली असते त्यांनी ईश्वरासाठी त्याग म्हणून एक बकरा यांची कुर्बानी बळी द्यायची असते. हे संपूर्ण अन्न गोर गरीब अथवा नातेवाईकांना वाटून दयायचे असते. थोडक्यात बकरी ईद म्हणजे त्याग, दानधर्म, गरीबा प्रति दया, करूणा व बंधुभाव याचा संस्कार करणारा सण असतो.
त्यामुळेच समग्र महाराष्ट्र जनतेचा सन्मान करण्यासाठी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दुसर्या दिवशी म्हणजे 30 व 31 जून रोजी साजरी करावी व महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम मध्ये सौहार्दाचे वातावरण ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.