आदरणीय, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस..86 व्या वर्षात पदार्पण.. अण्णा खूप खूप शुभेच्छा…
अण्णा हजारे यांचा संदेश:
युवाशक्ती ही राष्ट्र शक्ती आहे युवाशक्ती जागृत झाली तर गाव समाज देशाचे उज्वल भविष्य दूर नाही असं मला वाटतं. कारण मी 25 वर्षाचा युवक होतो सारखा विचार करीत होतो की जन्माला येताना प्रत्येक माणूस रिकाम्या हाताने येतो आणि आयुष्याच्या शेवटी जातानाही रिकाम्या हातानेच जातो. मग त्याचा जगण्याचा उद्देश काय? स्वामी विवेकानंदजी, महात्मा गांधीजींच्या विचारांचा जीवनावर प्रभाव पडला. स्वातंत्र्यपूर्व काळात 1938 मध्ये माझा जन्म झालेला असल्यामुळे 1857 ते 1947 च्या स्वातंत्र्यलढ्याची वाचून, ऐकून जाणीव झाल्यामुळे आणि अनेक वेळा फक्त स्वतःसाठीच जीवन जगणारी माणसं कायमचीच मरतात. मग ती लखपती असू द्या अथवा करोडपती असू द्या.
मात्र जी माणसं माझा गाव माझा समाज आणि माझा देश यांचा विचार करतात ती माणसं कायमचीच जगत असतात. ती फक्त शरीराने जातात अशा माणसांच्या कामातून गाव, समाज, देशातील कार्यकर्त्यांना दिशा मिळत असते. मी युवक असताना पंचवीस वर्षाच्या वयात निर्णय घेतला की लग्न नाही करायचं. कारण लग्न करावं तर चूल आणि मूलांमध्येच वेळ जाईल. मगं गाव समाज आणि देशाची सेवा करता येणार नाही.
आज माझे वय 85 वर्ष पूर्ण झाले आहे 86 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गावच्या यादवबाबा मंदिरात राहतो. प्रत्येक युवकाने अविवाहित राहण्याची गरज नाही प्रपंच करून ही गाव समाजाची सेवा करता येते. फक्त जीवनात आपले आचार शुद्ध असावेत, विचार शुद्ध असावेत, जीवन निष्कलंक असावं, जीवनात त्या करावा आणि अपमान पचवण्याची शक्ती असावी म्हणजे प्रपंच करूनही माझ्यापेक्षा अधिक चांगल कार्य करू शकतात.
धन्यवाद.
आपला,
कि. बा. तथा अण्णा हजारे