सवंत्सरनगरीत माउली विसावली
संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान
सासवड:
टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत आषाढी वारीने पंढरीस निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज ( दि . १४ ) रोजी संत सोपानदेवांच्या सवंत्सरनगरीत विसावला. उद्या गुरुवार दि. १५ रोजी संत सोपानदेव पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.
पुणे मुक्कामी पहाटे सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांच्या हस्ते माऊलींची नित्यपूजा व आरती करून सकाळी ६ वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेवून सासवडकडे मार्गक्रमण केले. पुणे ते सासवड हा समारे ३० कि.मी. चा टप्पा. हा पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा असल्याने वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती. सकाळी ७.४५ वाजता हा सोहळा शिंदेछत्री येथे पोहोचला. तेथे आरती झाल्यानंतर सोहळा हडपसरकडे मार्गस्थ झाला. माऊलींच्या सोहळ्या पाठोपाठच तुकोबारायांचा सोहळा याच मार्गाने लोणी-काळभोरकडे मार्गस्थ झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. आज एकादशी असल्याने ठिकठिकाणी वारकऱ्यांना फराळांच्या पदार्थाचे वाटप केले जात होते. सकाळी ९. १५ वाजता हा सोहळा हडपसर येथे पोहोचला. हडपसर येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. अल्पशा विश्रांतीनंतर सकाळी १०.१५ वाजता माऊलींचा सोहळा सासवडकडे तर सकाळी १० वाजता तुकोबांचा सोहळा लोणी- काळभोरकडे मार्गस्थ झाला.
आज सकाळ पासूनच उकाडा जाणवत होता . पाऊस न झाल्याने राज्यातील पेरण्याही खोळंबल्याने त्याचा आषाढी पायी वारीवर परिणाम जाणवत होता . गतवर्षीपेक्षा निम्याने वारकऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची जाणवत होती . पुणे ते दिवेघाट या वाटचालीत मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. या मध्ये तरुण मुलामुलींची संख्या अधिक दिसून येत होती . माऊलींचा हा सोहळा उरळी देवाची मार्गे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी दुपारी १.३० वाजता वडकीनाला येथे पोहोचला. येथे वारकऱ्यांनी दुपारचा फराळ व विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर दुपारी २.३० वाजता हा सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला.
सुरवातीला काहीसे ढगाळ वातावरण होते. घाटात मेघराजा आपली हजेरी लावेल अशी वारकऱ्यांची अपेक्षा होती . पण वारकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला . तळपत्या उन्हात दिवेघाट चढताना वारकऱ्यांसह सोहळ्यात सहभागी झालेले पुणेकर घामाने ओलेचिंब झाले . शासनाने व खाजगी सेवाभावी संस्थानी घाटात पाण्याचे टॅंकर उभा केल्याने भाविकांना काहीसा दिलासा मिळाला .
आळंदीत प्रस्थानाचे दिवशी वारकऱ्यांवर झालेला कथीत लाठीचार्ज व त्याचा विरोधी पक्षांनी केलेला निषेध लक्षात घेता दिवेघाटात पोलिसांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतली . रथाच्या जवळपास केवळ आठदहा पोलिस चालताना दिसत होते पण ते कोणालाही गर्दीपासून दूर करताना दिसत नव्हते . पण काही शेतकऱ्यांची उत्साही तरुण मुले रथाच्या पुढे गाडीच्या चाबकाचा आवाज काढीत रथापुढील गर्दी कमी करताना दिसत होते .
राज्यात अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने दिवेघाटातील सह्याद्रिच्या पर्वतरांगाही उघड्या बोडक्या दिसत होत्या . या पर्वतरांगा मध्ये ज्ञानोबा तुकोबांचा अखंड जयघोष चालू होता. वारकऱ्यांच्या व भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते कोण बोलवितो हरिवीण !!
या अभंगाप्रमाणे भाविकांची स्थिती झाली होती. सुमारे साडेचार कि. मी. चा दिवेघाट चढताना वारकऱ्यांच्या भक्तीमध्ये आणि उत्साहामध्ये कोठेही खंड पडत नव्हता. दिंड्यादिंड्यामध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीने मधूर चालीमध्ये अभंग गायले जात होते. अबालवृद्ध या भजनात तल्लीन होवून गेले होते. या वाटचालीत मध्येच एखादी वाऱ्याची झुळुक वारकऱ्यांना सुखावत होती. डोंगरमाथ्यावर हजारो भाविक घाटातील वाटचाल पाहण्यासाठी व माऊलींच्या दर्शनासाठी आसुसली होती. माऊलींचा पालखी सोहळा दिवेघाट पार करून सायंकाळी ४. ५० वाजता दत्त मंदिराजवळ पोहोचला. वडकीनाला ते झेंडेवाडी हा केवळ सात कि.मी. चा टप्पा पार करुन सायंकाळी ५ वाजता सोहळा झेंडेवाडी येथे पोहोचला.
पुरंदर तालुक्यात पालखी सोहळ्याचे स्वागत पुरंदरचे आमदार संजय जगताप,माजी राज्यमंत्री दादा जाधवराव ,माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुब्रम्ह्ण्यम स्वामी, प्रांताधिकारी मिनहाज मुल्ला , नायब तहसीलदार दत्तात्रेय गवारी,मुख्याधिकारी निखिल मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी केले. सायंकाळी सोहळा सासवड मुक्कामी विसावला .