महावितरणचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
मुंबई-
ऊर्जा ही सर्व प्रगती साध्य करण्याची मुलभूत गरज आहे. सर्व क्षेत्रांच्या प्रगतीकरिता आवश्यक तेवढी ऊर्जा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याद्दष्टीने महावितरण सध्या चांगले काम करत आहे. गेली अनेक वर्षे महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी सातत्याने कठोर परिश्रम करत आहेत. ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत वीजपुरवठा देत वीजहानी कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
महावितरणच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून स्मार्ट मीटर, स्काडा असे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवायचे आहेत.यापुढेही आपण ग्राहक सेवेच्या गुणवत्तेत सातत्य राखाल. येणाऱ्या काळात महावितरणची आणि पर्यायाने राज्याची प्रगती अधिक जोमाने होईल असे प्रतिपादन श्री लोकेश चंद्र यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर, महावितरणचे संचालक(संचालन) संजय ताकसांडे, संचालक(वित्त) अनुदीप दिघे, संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक(वाणिज्य) योगेश गडकरी व संचालक (मानव संसाधन) अरविंद भादिकर उपस्थित होते.
श्री.लोकेश चंद्र पुढे म्हणाले, ‘केंद्राच्या मदतीने राज्यात आरडीएसएस योजना राबवण्यात येत आहे. ही योजना यशस्वी होण्याकरिता चांगल्याप्रकारे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा होईल. क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार असल्याने उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना स्पर्धात्मक दराने वीज मिळण्यास मदत होईल. तसेच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवायचा असून यामुळे वीजदर कमी होणे अपेक्षित आहे. या सर्वाचा फायदा राज्यातील उद्योगांना होईल.
मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री विश्वास पाठक म्हणाले, ‘राज्यात औद्योगिक व आर्थिक प्रगती साधायची असेल तर वीज ही अत्यावश्यक घटक आहे. त्याकरिता विजेचे नियोजन आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वीज यंत्रणेचे सक्षमीकरण झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी वन ट्रिलीयनवर नेण्यास महाराष्ट्र तयार आहे.
महावितरणसमोरील आव्हाने या विषयावर बोलताना दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर म्हणाले, ‘मंडळापासून कंपनी झाल्यानंतर महावितरणची परिस्थिती चांगली झाली आहे. मात्र अद्याप काही सुधारणा करणे अपेक्षित आहे. ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवणे गरजेचे आहे. आज ग्राहक आपल्या हक्कांबद्दल जागरूक आहेत त्यामूळे महावितरणला अधिक ग्राहकाभिमुख व्हावे लागेल. आर्टीफिशियाल इंटीलीजन्सचे दिवस आले असून यातही आपले अस्तित्व टिकवून ठेवले पाहिजे. याकरिता कठोर परीश्रमाशिवाय पर्याय नाही. वीज क्षेत्र हे सर्व प्रगतीचा कणा आहे. तो सक्षम असणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमास महावितरणमधील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रणाली निमजे यांनी केले तर आभार कंपनी सचिव अंजली गुडेकर यांनी मानले. वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दुपारच्या सत्रात ‘मनाची अमर्याद शक्ती’ या विषयावर डॉ.दत्ता कोहिनकर यांनी कार्यशाळा घेतली. तर सायंकाळी स्वरस्पर्श हा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला.