पुणे- पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक होईल असे मत सर्व स्तरावरून व्यक्त होत असताना भाजपा मध्ये स्वरदा बापट,संजय काकडे,मुरलीधर मोहोळ,जगदीश मुळीक आणि खुद्द चंद्रकांत पाटील यांच्या नावांची चर्चा असताना भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित वज्रमूठ केल्यावर आता पुन्हा आघाडीत वेगवेगळ्या हालचाली दिसून येऊ लागल्या आहेत.काँग्रेस पक्षाची पुण्याची जागा असल्याने कॉंग्रेसकडून एकनिष्ठ म्हणून दिल्लीपर्यंत परिचित असलेले मोहन जोशी तसेच आमदार रवींद्र धंगेकर,आक्रमक आणि अभ्यासून म्हणून परिचित असलेले अरविंद शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरु झालेली आहे.कॉंग्रेस मधून महागाई विरोधात रान पेटविणारे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नावालाही पाठींबा मिळतो आहे. तर माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सुद्धा पुढे यावे असे काही कार्यकर्ते बोलत आहेत पण बागवे स्वतः निवडणुकीस इच्छुक नसल्याचेही बोलले जाते, त्यांना पुणे काँटांमेन्ट विधानसभेतच रस आहे..तर बागुल यांचेही तसेच आहे,त्यांना पर्वती विधानसभा मतदार संघातच रस आहे.पण अलीकडे राजकारणात आणखी घडामोडी घडत असताना लोकसभेच्या मैदानात दीपक मानकर यांच्या नावाची देखील एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. दीपक मानकर हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचेच आहेत.पण कलमाडींच्या काळात त्यांना डावलले गेल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.पुण्याच्या राजकारणात मानकर यांच्या नावाचे वर्चस्व आहे. ते माजी उपमहापौर आहेत.त्यांना उमेदवारी दिली तर कॉंग्रेससह शिवसेना,व अन्य पक्षातूनही अनेकजन त्यांच्या पाठीशी राहतील असा सूत्राचा दावा आहे. कॉंग्रेसमध्ये तगडा उमेदवार कोणी नाही असा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा दावा आहे. ज्यांनी मानकर यांचे नाव पुढे केल्याचे समजते आहे. रवींद्र धंगेकर आताच कसब्यातून १२/१३ हजार मतांनी निवडून आलेत. त्यामागे कॉंग्रेसची ५ वर्षातील लोकांशी असलेली नाळ,आणि भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घातलेला घोळ कारभार व खुद्द धंगेकर यांना ‘आपला माणूस’ म्हणून माध्यमांनी उचलून धरल्याने शिवाय भाजपने चुकीचा उमेदवार दिल्याने कसब्याचा गड कॉंग्रेसच्या ताब्यात आलेला आहे असे असताना आता तेथील विजयी उमेदवार हलविण्या ऐवजी ‘भाग १’ मध्ये हिरो ठरलेले आणि सुपरहीट झालेले धंगेकर ‘भाग २’लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला यशस्वी टक्कर देऊ शकतील काय ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.बापट नसले तरी त्यांचे कुटुंबीय राजकारणात आहेत आणि कॉंग्रेसने मोहन जोशी यांना यापूर्वी ३ वेळा लोकसभा लढण्याची संधी दिलेली आहे यामुळे या नावावर देखील राष्ट्रवादीच्या गोटातून शंका व्यक्त केली जाते आहे.अशा अवस्थेत कॉंग्रेसमध्ये मानकर यांच्या नावाचा विचार काही नेत्यांपुढे आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांपुढे मांडला जाण्याची शक्यता आज सकाळीच येथे सुत्रांनी वर्तविली आहे.तर शिवसेनेच्या गोटातून मानकर यांच्या नावाला पाठींबा दिला जातोय मात्र काही जणांची इछ्या आहे की मानकर यांनी शिवसेनेत यावे.एकीकडे महाविकास आघाडीत अशा पद्धतीने सर्वांगीण विचार होत असताना भारतीय जनता पार्टीने देखील अनेकांशी चर्चा सुरु केलेली आहे. वेगवेगळ्या स्तरावर सर्वेक्षणे भाजपा तसेच राष्ट्रवादी देखिल करत असल्याची माहिती आहे. संजय काकडे यांचे लोकसभेच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व मतदार संघात प्राबल्य आहे.मात्र मोहोळ यांच्याबाबत पक्षातच अनुकुलता दिसत नाही.५ वर्षाच्या महापालिकेतील सत्तेच्या काळात त्यांना साडेतीन वर्षे मुख्य पदाधिकारी होण्याची संधी पक्षाने दिली आहे हे यामागील कारण असल्याचे सांगण्यात येते आहे.स्वर्गीय गिरीश बापट यांच्या कुटुंबात उमेदवारी द्यायचा निर्णय होईल काय ?बापटांच्या निधनानंतर त्यांच्या सुनेला सहानुभूती मिळेल काय ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.तर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही नाव या उमेदवारीसाठी विचाराधीन असल्याचे सांगण्यात यते आहे.जर चंद्रकांत दादांना पुणे लोकसभेवर विजय प्राप्त होत असेल तर पुढील विधानसभेत कसब्यात स्वरदा बापट आणि कोथरूड मध्ये मेधा कुलकर्णी यांचा मार्ग मोकळा करून द्यावा मोहोळ यांना विधानपरिषदेवर घ्यावे असे पर्याय सुचविले जात आहेत.