राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष पद्मश्री भिकूजी उर्फ दादा इदाते यांचे मत : लोकतंत्र सेनानी संघाची विभागीय बैठक संपन्न
पुणे : समरसता हा केवळ पांडित्याचा किंवा प्रबोधनापुरता मर्यादित विषय नसून समरसता हे जीवनमूल्य आहे; तो प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे. समरसतेचा विषय सामाजिक विषय सूचीवर प्राधान्याने आणून, समाज बांधणी केली पाहिजे, असे मत राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष पद्मश्री भिकूजी उर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केले.
१९७५ मध्ये आणीबाणी विरोधात, लोकशाहीच्या रक्षणासाठी कारागृहात बंदीवासात असलेल्या मिसाबंदी व सत्याग्रहींची लोकतंत्र सेनानी संघाची विभागीय बैठक पुण्यात पार पडली. “लोकतंत्र सेनानी संघाच्या पुणे – मुंबई व कोकण विभागाच्या कार्यकारिणी सदस्यांची ही विभागीय बैठक होती. लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र प्रांत प्रवक्ता अनिल भदे, केंद्रीय कार्यकारिणी समिती सहसचिव अनुपमा लिमये, पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख मुरलीधर घळसासी आणि पुणे, मुंबई सह कोकण विभागातील लोकतंत्र सेनानी संघाचे ४० प्रतिनिधी उपस्थित होते.
अनिल भदे म्हणाले, गावपातळी पासून ते तालुका जिल्हानिहाय विभागीय बैठकांचे आयोजन करुन संघटना जागृत ठेवून लोकतंत्र सेनानी संघाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले पाहिजे. यावेळी त्यांनी लोकतंत्र सेनानी संघाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला आणि लोकतंत्र सेनानी संघाच्या पुढील कार्याची रुपरेषा सांगितली.
कार्यक्रमाची सुरूवात निलिमा भिडे यांचे सुश्राव्य सरस्वती वंदनाने झाली. जिल्हाध्यक्ष विलास फाटक यांनी पुणे जिल्हा व शहराच्या कार्याचा आढावा घेऊन मानधना संदर्भात अद्ययावत माहिती दर्शविणाऱ्या शासकिय “भीम अॅप’ विषयी उपयुक्त निवेदन केले.