मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम टाऊन असलेल्या ठाणे शहरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तर, मुंबईतील ताडदेव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 2 जण गंभीर झाले आहेत. सोमवारी रात्री या दोन्ही घटना घडल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही घटनांची दखल घेत आज ठाण्यात तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच विरोधकांवर हे हल्ले करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
मुंबईच्या ताडदेव भागात सोमवारी रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 3 कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने हल्ला केला. यामध्ये तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, हल्ला कुणी केला? हल्ल्यामागील नेमके कारण काय?, हे अद्याप समजू शकले नाही.