डॉ. विश्वनाथ कराड यांना रोटरी जागतिक शांतता पुरस्कार प्रदान
पुणे: “शांतीचा अर्थ संघर्षाचा अभाव नसून शांती ही सकारात्मक संकल्पना आहे. ज्याला शांती नांदावी असे वाटते, त्याने याची सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी व त्यानंतर नक्कीच ती आपोआप समाजापर्यंत, देशापर्यंत आणि पर्यायाने जगापर्यंत पोहोचेल. ” असे उद्गार अमेरिकेमधील रोटरी फौंडेशन आयएल एव्हेनस्टोनचे चेअर इलेक्ट रोटेरियन (रो.) श्री. पॉल नेटझेल यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगर, रोटरी प्रांत 3131 व डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतराष्ट्रीय सामंजस्य व शांती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रो.श्री.प्रशांत देशमुख हे होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना रोटरी जागतिक शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी 2007 चे नोबेल शांतता पुरस्कार (ग्रुप अॅवॉर्ड) विजेते रो. राजेंद्र शेंडे, आरसीपीएस, पीपी चे अध्यक्ष रो. श्री. प्रदीप वाघ, समन्वयक रो. श्री. विनय साठे, रो. विनय कुलकर्णी, रो.प्रशांत देशमुख, रो. नितीन नाईक हे उपस्थित होते.
रो. पॉल नेटझेल म्हणाले, “ शांतता ही सामूहिकरित्याच प्राप्त करता येते. ही कामगिरी रोटरी क्लब संपूर्ण जगभर करीत आहे. खरे म्हणजे, संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्मितीत रोटरी क्लबचा सुद्धा खारीचा वाटा आहे. दुसर्या महायुद्धाच्या काळात रोटरीचे काम जवळजवळ थांडावले होते. 1947 मध्ये म्हणजे दुसर्या महायुद्धानंतर हे कार्य पुन्हा सुरु झाले. विषमता कमी करण्याच्या ध्येयाला आम्ही कटीबद्ध आहोत. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळणे यामुळे शक्य होते. गरिबी निर्मूलन, शिक्षणप्रसार, आरोग्यसेवा व इतर अनेक क्षेत्रे आहेत, जेथे आम्ही कार्यरत आहोत व त्यामधून आम्हाला चांगले परिणामही मिळाले आहेत. अलिकडे आम्ही तरुण विद्यार्थ्यांना रोटरी शांतता शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन ते भविष्यकाळात शांतीदूत बनतील. ”
रो. राजेंद्र शेंडे म्हणाले, “संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास उद्दिष्ट्ये आणि विश्वशांती यांचा खूपच जवळचा संबंध आहे. जगातील सर्व लोकांच्या गरजा भागविण्यास पृथ्वी सक्षम आहे. परंतू एखादा लोभी मनुष्य असेल, तर मात्र तिची शक्ती तोकडी ठरेल. सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रोतांचे आपण अनिर्बंधपणे शोषण करीत आहोत. दुर्दैवाने आपणास अजून ओझोन थरावरील छिद्रे, पृथ्वीचे वाढते तापमान यामधील धोका लक्षात आलेला नाही. विकासाचा वाढता वेग आणि त्याची तीव्रता ही भयावह होत चालली आहे. सुदैवाने आपल्यापैकी काही लोकांना ही वस्तूस्थिती समजू लागली आहे आणि त्यादृष्टीने उपाय करण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. ”
प्रा. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ रोटरी इंटरनेशनलसारख्या संघटनेने विश्वशांतीच्या कार्यात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे, हे एक चांगले लक्षण आहे. जगातील लोक सध्या आतंकवाद, दहशतवाद, रक्तपात व युद्धासारख्या संकटांनी ग्रासले गेलेले आहेत. आपण सर्वजण एकाच कुटुंबाचे घटक आहोत. आपण जर एकत्र राहिलो, तरच आपणाला शांततेने जगता येईल. जगातील अतिप्राचीन अशा अथर्ववेदाने हाच संदेश दिलेला आहे. सॉल्ट लेक सिटी येथील सर्व धर्म परिषदेत उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी या वैश्विक विचाराचे एकमताने स्वागत केले.”
रो. श्री. प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती वृंदा वाळिंबे यांनी सूत्रसंचालन केले.
रो. श्री. विनय साठे यांनी आभार मानले.