पुणे-राज्यावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून राजकीय अस्थिरतेचं सावट सरकारवर फिरू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. “राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधीमंडळ नियुक्तीसंदर्भात मध्यस्थी केली नाही, तर मला राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला.
राज्यात करोनानं शिरकाव करत हातपाय पसरल्यानं मोठं संकट उभं राहिलं.
करोनाचा धोका लक्षात घेता राज्यातील छोट्यामोठ्या कार्यक्रमासह निवडणूकाही रद्द करण्यात आल्या. यात जाहीर झालेली विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर गेल्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वाचा मुद्दा चर्चेत यायला सुरूवात झाली. सरकारला स्थिरता देण्यासाठी महाविकास आघाडीनं त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुर करून राज्यपालांना पाठवण्यात आला. त्यावर निर्णय न झाल्यानं पुन्हा राज्यपालांना यासंदर्भात आठवण करून देणारा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या निर्णय लांबत असल्यानं राजकीय अस्थिरता राज्यात घर करून लागली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी फोनवरून चर्चा केली. “करोनाचं संकट असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याचबरोबर आपण मध्यस्थी केली नाही, तर मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल,” असं ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं. त्यावर “या प्रकरणात आपण लक्ष घालू” असं आश्वासनं मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलं आहे. असं वृत्त एएनआय वृत्त संस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
पंतप्रधानांना फोन करण्याआधी शरद पवार यांच्याशी चर्चा
राज्यपालांकडून विधान परिषद नियुक्ती संदर्भात कोणताही निर्णय होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी राज्यात निर्माण होण्याची शक्यता असलेल्या राजकीय अस्थिरतेबद्दल शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देत मध्यस्थी करण्याची मागणी केली.