-खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या ,सरदार मनमोहन सिंग यांचा ज्या प्रकारे आदर केला जातो , तो आदर राजकारणातील फार कमी लोकांना मिळतो ,त्यांच्यापासून प्रेरणा मिळते प्रामाणिक पणाची .त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रभागी राहील , जे त्यांच्या विरोधकांकडून अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत स्थिर राहिले.ते खऱ्या अर्थाने समतावादी, हुशार , प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते . राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस.
PMमोदी म्हणाले- सौम्यता हे त्यांच्या संसदीय जीवनाचे वैशिष्ट्य
मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाने घेरलेल्या देशात नव्या अर्थव्यवस्थेचा मार्ग मोकळा केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांची जनतेशी आणि देशाच्या विकासाची बांधिलकी नेहमीच आदराने पाहिली जाईल. डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते. त्यांची नम्रता आणि सौम्यता हे त्यांच्या संसदीय जीवनाचे वैशिष्ट्य ठरले.पक्षीय राजकारणाच्या वर उठून त्यांनी प्रत्येक पक्षातील लोकांशी संपर्क ठेवला आणि ते सहज उपलब्ध राहिले. इथे दिल्लीत आल्यानंतरही मी त्यांना भेटायचो, बोलायचो. त्यांच्यासोबत झालेल्या माझ्या भेटीगाठी आणि चर्चा मला नेहमी आठवतील. या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. मी सर्व देशवासियांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो.
राज ठाकरे म्हणाले,भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं. जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, “no power on earth can stop an idea whose time has come”. थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, “I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…. ” डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच. डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन…
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेला डॉ. मनमोहन सिंह यांनी नवी दिशा दिली. त्यांच्या साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने ते एक महान नेते बनले. त्यांचं योगदान देशाच्या कायम स्मरणात राहील.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. जगाशी स्पर्धा करणारा मजबूत भारत घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.एका जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत. सन 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग यांना प्रथमताच अर्थ खात्याची जबाबदारी मिळाली. याच काळात आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी अर्थव्यवस्थेची दिशा बदलून दाखविली. आज जो सामर्थ्यशाली भारत निर्माण झाला आहे त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा मोठा वाटा आहे.पंतप्रधान म्हणून सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. सामान्य माणसांच्या हक्कांचे रक्षण करून, त्यांचा आवाज बुलंद केला. सन 2008 मध्ये राष्ट्रव्यापी शेतकरी कर्ज माफी जाहीर करून त्यांनी देशातील शेतकऱ्यांना धीर दिला. याशिवाय राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र अर्थात आधार, लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ मिळवून देणे, अन्नसुरक्षा कायदा यासारखे धाडसी निर्णय त्यांनी केले.राजकीय हेतूने मनमोहन सिंग यांच्यावर टीका झाली असली, तरीही इतिहास मात्र त्यांची नोंद अत्यंत सकारात्मक घेईल.एक सामर्थ्यशाली देश घडविणाऱ्या कणखर आणि खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
–माजी मंत्री बाळासाहेब थोरात