अमोल शिंदे प्रकरणावर हिंदू महासंघाची भूमिका
पुणे :’ धूर निघणारे फटाके संसदेत फोडणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदे सारख्या हिंदू युवकांवर अतिरेकी असल्याचा ठपका ठेवू नका,बेरोजगारीबाबत त्यांचा राग समजून घ्या,या प्रकरणातून धडा घेऊन दहशत वादाची व्याख्याच नव्याने ठरवा’,अशी मागणी आज हिंदू महासंघने पत्रकाद्वारे व्यक्त केली.
दरम्यान,दवे यांनी लातूर येथे अमोल शिंदे यांचे बंधु संतोष शिंदे यांची भेट महासंघच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली.संघटनेचे प्रदेश पदाधिकारी मनोज तारे,विवेक परदेशी,सूर्यकांत कुंभार,उमेश कुलकर्णी आणि राहुल आवटी यावेळी उपस्थित होते. हिंदू महासंघ चे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी या प्रकरणाच्या विविध पैलूंवर मत प्रदर्शित करून सत्ताधारी भाजपवर कडक टीका केली.
मराठा आरक्षण मिळून देखील भवितव्य घडेल यावर विश्वास नसल्याने,नोकऱ्यांचा बॅकलॉग भरला जात नसल्याने युवक अस्वस्थ आहे,हे या प्रकरणातून दिसून येते.त्यावर कोणताच नेता बोलताना दिसत नाही.त्याचा राग कुठेतरी व्यक्त होणार,तो चुकीच्या पद्धतीनेही व्यक्त होऊ शकतो.हा राग समजून बेरोजगारीवर उपाययोजना केली पाहिजे,असे आनंद दवे यांनी यावेळी सांगितले.
अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन एक्ट (यु ए पी ए )मध्ये पकडल्यानंतर शिक्षा होण्याचे प्रमाण ३ टक्केही नाही,इतके या कायद्याचे अपयश आहे.तरीही या कायद्याचा वापर सर्रास सुरु आहे. मग,दहशतवादाची व्याख्याच नव्याने करायची गरज निर्माण झाली आहे.सभागृहात बॉम्ब घेऊन जाणारा अतिरेकी असतो की फटाका घेऊन जाणारा अतिरेकी हे ठरवायला हवे,असेही दवे म्हणाले.
‘आज पर्यंत काँग्रेस सारखे पक्ष हिंदू अतिरेकी हा शब्द प्रयोग वापरत होते.भाजप हा पक्ष या शब्द प्रयोगाला विरोध करीत होता.पण आता सत्ताधारी भाजपच हिंदू युवकांना पकडून अतिरेकी असल्याचा ठपका ठेवत आहे. हिंदूंना अतिरेकी ठरविण्याचे काम होत असून त्यामुळे विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल’. १३ डिसेंबर २००१ चा लोकसभेवरील हल्ला आणि १३ डिसेंबर २०२३ चे प्रकरण यातील फरक भाजपने स्पष्ट केले पाहिजे. २००१ चा हा हल्लाच होता ,पण आताचे आहे ते केवळ एक प्रकरण आहे. शिवाय भाजपच्या सत्तेच्या काळातच अक्षरधाम,संसद गोळीबार,पुलवामा अशी प्रकरणे घडतात ? असाही प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत विचारला.
‘या प्रकरणातील युवकांनी ज्यांना ज्यांना फोन केले त्या सर्वाना कटातील सहभागी म्हणून आरोपी केले आहे . मग,ज्या सुरक्षा सैनिकांनी आत सोडले,त्यांना का या कटातील आरोपी मानून अटक करीत नाही ?’ असा प्रश्न या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.

