पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्वर्वेद महामंदिराचे केले उद्घाटन

Date:

“आज काळाची चक्रे पुन्हा फिरली आहेत आणि भारत आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीची घोषणा करत आहे”

“काशीचा कायापालट करण्यासाठी सरकार, समाज आणि संत समाज सर्वजण एकत्रितपणे काम करत आहेत”

“स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक आहे”

“भारताची वास्तुकला, विज्ञान, योग अध्यात्मिक संरचनांमधूनच अकल्पनीय उंचीवर पोहोचली आहे “

“आता बनारस म्हणजे – विकास, आधुनिक सुविधा याबरोबरच विश्वास आणि स्वच्छता आणि परिवर्तन”

नऊ संकल्प मांडले

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील उमराहा येथे स्वर्वेद महामंदिराचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी महर्षी सदाफल देवजी महाराज यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली आणि मंदिर परिसराला फेरफटका देखील मारला.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की आज त्यांच्या काशी भेटीचा दुसरा दिवस आहे आणि काशीमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण अभूतपूर्व अनुभवांनी भरलेला आहे. दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय विहंगम योग संस्थेच्या वार्षिक सोहळ्याची आठवण सांगून, यावर्षीच्या शताब्दी सोहळ्याचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले  की, विहंगम योग साधनेने शंभर वर्षांचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे.

त्यांनी महर्षी सदाफल देव जी यांचे मागील शतकात ज्ञान आणि योगासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले आणि सांगितले की त्यांच्या दिव्य प्रकाशाने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. या शुभ प्रसंगी पंतप्रधानांनी 25,000 कुंडिया स्वर्वेद ज्ञान महायज्ञाच्या आयोजनाचा उल्लेख केला. महायज्ञातील प्रत्येक आहुती विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी महर्षी सदाफल देवजींसमोर मस्तक टेकवले आणि त्यांचे विचार पुढे नेणार्‍या सर्व संतांना अभिवादन केले.

काशीचा कायापालट करण्यात सरकार, समाज आणि संत समाज यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी स्वर्वेद महामंदिर हे या सामूहिक भावनेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. हे मंदिर दिव्यतेचे तसेच भव्यतेचे मनमोहक उदाहरण आहे असे पंतप्रधान म्हणाले. “स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक आहे” असे ते म्हणाले. मंदिराच्या सौंदर्याचे आणि आध्यात्मिक वैभवाचे वर्णन करताना पंतप्रधानांनी हे ‘योग आणि ज्ञान तीर्थ’ असल्याचे सांगितले.

भारताच्या आर्थिक समृद्धी आणि भौतिक विकासाचे स्मरण करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने कधीही भौतिक प्रगतीला भौगोलिक विस्तार किंवा शोषणाचे माध्यम बनू दिले नाही. “आम्ही आध्यात्मिक आणि मानवी प्रतीकांद्वारे भौतिक प्रगतीचा पाठपुरावा केला” असे ते म्हणाले. त्यांनी काशी, कोणार्क मंदिर, सारनाथ, गया स्तूप आणि नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठांची उदाहरणे दिली. “या अध्यात्मिक संरचनांमधूनच भारताची वास्तुकला अकल्पनीय उंचीवर पोहोचली आहे” याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

हे भारताच्या विश्वासाचे प्रतीक होते ज्याला परकीय आक्रमणकर्त्यांनी लक्ष्य केले होते हे अधोरेखित करत स्वातंत्र्यानंतर त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. एखाद्या वारशाचा अभिमान न बाळगण्यामागील विचार प्रक्रियेबद्दल दुःख व्यक्त करत, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके दुर्लक्षित राहिलेल्या सोमनाथ मंदिराचे उदाहरण देताना अशा प्रतीकांचे पुनरुज्जीवन केल्याने देशाची एकात्मता अधिक दृढ  झाली असती, असे पंतप्रधान म्हणाले. याने देशाला न्यूनगंडाच्या भावनेत नेले, असे मोदी म्हणाले. “आता कालचक्र पुन्हा फिरली आहेत आणि भारत आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. सोमनाथमध्ये सुरू झालेल्या कामाचे आता संपूर्ण मोहिमेत रूपांतर झाल्याचे सांगून त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर, महाकाल महालोक, केदारनाथ धाम आणि बुद्ध सर्किटचे उदाहरण दिले. पंतप्रधान मोदी यांनी राम सर्किटवर सुरू असलेल्या कामाचा आणि लवकरच अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाचाही उल्लेख केला.

जेव्हा एखादं राष्ट्र सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक ओळख समाविष्ट करते तेव्हाच सर्वांगीण विकास शक्य होतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. “म्हणूनच, आज आपल्या ‘तीर्थां’ ना नवसंजीवनी मिळत आहे आणि भारत आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे नवे विक्रम रचत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. काशीचे उदाहरण देत त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला. गेल्या आठवड्यात दोन वर्षे पूर्ण झालेल्या नवीन काशी विश्वनाथ धाम परिसराने शहरातील अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला नवी गती दिली आहे.”, असे त्यांनी सांगितले. “आता बनारसचा अर्थ आहे – विकास, आधुनिक सुविधांसह विश्वास आणि स्वच्छता आणि परिवर्तन”, असे पंतप्रधानांनी सुधारित संपर्क सुविधांची माहिती देताना सांगितले. रस्त्यांचे चौपदरीकरण – सहापदरीकरण, रिंग रोड, रेल्वे स्थानकाचे अपग्रेडेशन, नवीन गाड्या, समर्पित मालवाहतूक मार्गिका, गंगा घाटांचे नूतनीकरण, गंगा क्रूझ, आधुनिक रुग्णालये, नवीन आणि आधुनिक दुग्धव्यवसाय, गंगा नदीकाठी नैसर्गिक शेती, तरुणांसाठी प्रशिक्षण संस्था आणि सांसद रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार या गोष्टी त्यांनी नमूद केल्या.

अध्यात्मिक प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आधुनिक विकासाची भूमिका अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी वाराणसी शहराबाहेर असलेल्या स्वर्वेद मंदिराशी असलेल्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. बनारसला येणाऱ्या भाविकांसाठी ते एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येईल, ज्यामुळे आसपासच्या गावांमध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

“विहंगम योग संस्थान समाजाच्या सेवेइतकेच आध्यात्मिक कल्याणासाठीही समर्पित आहे”, महर्षी सदाफल देवजी हे योगनिष्ठ संत तसेच स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्य सैनिक होते, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये त्यांचे संकल्प पुढे नेण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी 9 संकल्प मांडले आणि त्यांची पूर्तता करण्याचे आवाहन केले. प्रथम, पंतप्रधानांनी पाण्याची बचत आणि जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या संकल्पाचा उल्लेख केला, दुसरा संकल्प  – डिजिटल व्यवहारांबद्दल जागरूकता निर्माण करणे, तिसरा संकल्प – गावे, परिसर आणि शहरांमध्ये स्वच्छतेचे प्रयत्न वाढवणे, चौथा संकल्प – स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांचा प्रचार करणे आणि वापर करणे, पाचवा – भारतातील प्रवास आणि शोध, सहावा- शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबद्दल जागरुकता वाढवणे,  सातवा संकल्प – तुमच्या दैनंदिन जीवनात भरडधान्य किंवा श्रीअन्न  यांचा समावेश, आठवा – खेळ, तंदुरुस्ती किंवा योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आणि शेवचा संकल्प – भारतातील गरिबी हटवण्यासाठी किमान एका गरीब कुटुंबाला आधार देणे. हे संकल्प पंतप्रधानांनी यावेळी मांडले.

विकसित भारत संकल्प यात्रेवर प्रकाश टाकताना, काल संध्याकाळी आणि आजही पंतप्रधानांचा सहभाग असलेल्या या यात्रेविषयी प्रत्येक धर्मगुरूंनी जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी  केले. “हा आपला वैयक्तिक संकल्प झाला पाहिजे”, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नरेंद्रनाथ पांडे, सद्गुरु आचार्य श्री स्वतंत्रदेव जी महाराज आणि संत प्रवर श्री विज्ञानदेव जी महाराज उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'जागल्या' संकल्पना राबविण्यात येणारपुणे- पुणे महानगरपालिका पथ...

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे - श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु...

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि....

महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

कॉंग्रेस भवनवर मोर्चा आणला त्यांनी ,चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना...