सोलापूर–
2024 मध्ये देशाच्या इतिहासातून मोदी शहा संपून जातील. भाजपची पाटी कोरी होणार. भाजपची आता दशकपूर्ती झाली आहे. रावणाप्रमाणाचे भाजपची 10 तोंडे देखील उडवले जातील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.
घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती झाली
पुढे राऊत म्हणाले, ”राज्यातील राजकारण राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 10 वर्षात सुरू झाले. आणि या घाणेरड्या राजकारणाची आता दशकपूर्ती झाली आहे. रावणाप्रमाणे यांचीही 10 तोंडे उडवले जातील” असा हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.
शिवसेना ठाकरेंची होती आणि राहणार
राऊत म्हणाले, ”शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती आणि राहणार आहे. निवडणूक आयोगाने कितीही गुलामी केली तर मूळ पक्ष हा दुसऱ्यांचा होत नाही. पक्षांचे अस्तित्व हे पक्षाच्या नेतृत्ववर अवलंबून असते. यापूर्वी शिवसेना संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला तरी शिवसेना संपली नाही. मोदी शहांना तर शिवसेना अजिबातच संपवता येणार नाही. देशाच्या इतिहासातून मोदी शहा संपतील. हुकूमशाहीची नोंद इतिहासात रहात नाही” असे संजय राऊत म्हणाले.
घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आघाडीवर
पुढे राऊत म्हणाले, ”देशाची घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आघाडीवर असतील. आंबेडकरांची ताकद आम्हाला जेव्हा मिळते तेव्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात विजयाचा मार्ग मोकळा होतो. फहार मोठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही सर्व एकत्र राहू. त्यामुळे सोलापूरचे राजकारण सुद्धा 2024 मध्ये बदलेल दिसेल” असेही राऊत म्हणाले.
बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा
तर 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांवर बोलताना राऊत म्हणाले, ”तेलंगणात सुद्धा भाजप आले होते. केसीआर यांचा पराभव करणे हे मोठे आव्हान होते. कारण केसीआर हे त्या राज्याचे निर्माते आहेत. मात्र त्यांचा पराभव मोदी शहा करू शकले नाहीत. 10 आमदारांचा टप्पाही भाजपला तिथे गाठता आला नाही. मात्र राहुल गांधींनी तो पोराभव करून दाखवला. राजस्थानमध्ये सरकार बदलण्याची जनतेची मानसिकता आहे. मात्र मध्य प्रदेशमधील निकाल हा आश्चर्यकारक होता. बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा” असेही संजय राऊत म्हणाले.