पुणे, दि. ८ : तळवडे एमआयडीसी येथील कारखान्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपुस केली.सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुजित दिव्हारे, डॉ. हरीश टाटीया आदी उपस्थित होते.
ससून रुग्णालयात शिल्पा राठोड (वय-३१), प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्ष), अपेक्षा तोरणे (वय २६ वर्ष), कविता राठोड (वय ४५ वर्ष), रेणुका ताथोड, (वय-२० -वर्ष), शरद सुतार (वय-४५ वर्ष), कोमल चौरे (वय-२५ वर्ष), सुमन (४० वर्ष), उषा पाडवे (४० वर्ष) आणि प्रियंका यादव (३२ वर्ष) असे १० रुग्ण दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे.त्यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे त्यात म्हटले आहे कि,’पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो.या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्ण उपाययोजना केल्या जातील.