भुवनेश्वर-
ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार (कोषागार) आज उघडले जाणार आहे. राज्याचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी शनिवारी सांगितले की, ‘रत्न भांडाराचे आतील कक्ष रविवारपासून उघडण्याची प्रक्रिया सुरू होईल. श्रीमंदिरने समिती स्थापन केली आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी मंदिर संचालन समितीच्या सदस्यांसह रिझर्व्ह बँक आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. रत्न भंडारमधील सर्व गोष्टींचे डिजिटल दस्तावेज तयार केले जातील.उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ रथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ ते १.३० या वेळेत शुभ मुहूर्तावर रत्न भाडार उघडण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख अरविंद पाधी म्हणाले, ‘यापूर्वी १९०५, १९२६ आणि १९७८ मध्ये रत्न भंडार उघडण्यात आले होते. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मौल्यवान वस्तूंची यादी तयार केली होती. तीन खोल्यांपैकी २५ बाय ४० चौरस फूट आतील खोलीत ५० किलो ६०० ग्रॅम सोने आणि १३४ किलो ५० ग्रॅम चांदी आहे. बाहेरील खोलीत ९५ किलो ३२० ग्रॅम सोने आणि १९ किलो ४८० ग्रॅम चांदी आहे. सणासुदीला हे काढले जातात. सध्याच्या चेंबरमध्ये ३ किलो ४८० ग्रॅम सोने आणि ३० किलो ३५० ग्रॅम चांदी आहे. हे दैनंदिन विधींसाठी वापरले जातात. अहवालानुसार, यानंतर अंतर्गत भांडार देखील १४ जुलै १९८५ रोजी उघडण्यात आले, परंतु दुरुस्तीनंतर बंद केले. १९७८ पासून मंदिराकडे किती मालमत्ता आली याचा अंदाज नाही. १२ व्या शतकात बांधलेले जगन्नाथ मंदिर चार धामांपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत रत्न भांडार उघडणे हा मोठा मुद्दा होता. ओडिशात सरकार आल्यास तिजोरी उघडली जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होते. याआधी २०११ मध्ये तिरुअनंतपुरमच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचा खजिना उघडला होता. यात १.३२ लाख कोटी रुपयांचा खजिना सापडला होता.
साप रक्षण करतात…! तज्ज्ञ तैनात राहतील
असे म्हटले जाते की आतील रत्नांच्या भांडारात फुसफुसण्याचे आवाज येतात. सापांचा समूह भांडारातील रत्नांचे रक्षण करतो, असेही मानले जाते. त्यामुळेच रत्न भांडार सुरू होण्यापूर्वी मंदिर समितीने साप पकडण्यात पटाईत असलेल्या भुवनेश्वर येथील दोन व्यक्तींना पुरी येथे बोलावले आहे, जेणेकरून त्यांना कोणतीही अप्रिय परिस्थिती उद्भवल्यास सज्ज राहता येईल. आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांचे पथकही राहणार आहे.