नागपूर दि.६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात हिंदूकोड बिल लागू होण्यासाठी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. ते नेहमी महिलांच्या अधिकारासाठी त्यांच्या बाजूने उभे राहिले. ते एक उत्तम वक्ते, द्रष्टे नेते आणि समाजाला वळण देण्याची इच्छाशक्ती असणारे मोठे नेते होते अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.सामाजिक कार्य करताना आंबेडकर चळवळी सोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या समाजाने मला कायमच प्रेम, जिव्हाळा दिला आहे. त्यामुळे या समाजाचा कोणताही प्रश्न उपस्थित झाला तर त्या ठिकाणी तो तात्काळ सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जात असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जर नसते तर आज महिलांना उपसभापती,आमदार देखील होता आले नसते. त्यामुळे या महामानवांची मनापासून ऋणी असल्याची भावना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.